विखे पिता-पुत्रांचे अल्पावधीतच भाजपमध्ये वर्चस्व
लोगो : राजकारण
म. टा. प्रतिनिधी, नगर
लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर देत उमेदवारी मिळवून देण्याची भाषा करणारे आता स्वत:च उमेदवारीसाठी विखेंवर अवलंबून असल्याचे चित्र दिसू लागले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विखे पिता-पुत्रांनी अल्पावधीतच पक्षात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र, यातूनच संघर्षालाही सुरुवात झाली असून, भाजपमधील गटबाजीलाही नवे वळण मिळाले आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या आगामी विधानसभेच्या उमेदवारीसंबंधी वेगळी चर्चा सुरू झाली होती. अलीकडेच खासदार डॉ. विखे यांनी कर्डिले हेच राहुरीतून भाजपचे उमेदवार असतील, असे संकेत दिले. त्यावरून गेल्या काही महिन्यांतील राजकारणाचा प्रवास चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. विखे स्वत: उमेदवारीसाठी सर्वच पक्षांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते. अपक्ष किंवा कोणताही पक्ष अशी त्यांची भूमिका होती. त्यावेळी राहुरीत झालेल्या अनेक कार्यक्रमांतून कर्डिले यांनीच विखेंना भाजप प्रवेशाचे जाहीर आवाहन केलेले होते. 'तुम्ही भाजपात या, उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी आमची,' अशी भाषणे कर्डिले यांनी अनेकदा केली होती. याशिवाय जिल्ह्यातील इतरही काही भाजपच्या नेत्यांनी विखे पिता-पुत्रांना भाजप प्रवेशाची ऑफर त्यावेळी दिली होती.
मधल्या काळात राजकारण एवढे बदलत गेले, की आता विखे पिता-पुत्रांच्याच हाती पक्षाची सूत्रे आली आहेत. स्वतःच्या भाजप प्रवेशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात १२-० असा निकाल लावणार असल्याचा त्यांच्याकडून वारंवार व्यक्त केला जाणारा आत्मविश्वास व त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेल्या अकोल्याच्या मधुकरराव पिचडांसह त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांचा भाजप प्रवेश यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपच्या जागांवर कोणाला उमेदवारी द्यायची, हे ठरविण्यात त्यांचा मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे पूर्वी त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द देणारे आता त्यांच्याकडून उमेदवारीचा शब्द घेण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येते.
राहुरीच्या बाबतीत दोन दिवसांपूर्वीच याचे उदाहरण पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीतील कथित भूमिकेमुळे आमदार कर्डिले यांच्या विधानसभेच्या उमेदवारीबद्दल वेगळी चर्चा सुरू झाली. विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर आता मागील कर्डिलेंच्या कथित भूमिकेच्या चर्चेवर विखेंच्या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढली. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात डॉ. विखे यांनी कर्डिलेंच्या उमेदवारीबद्दल संकेत दिले. त्यामुळे तूर्त कर्डिलेंसंबंधीची चर्चा थांबणार असली, तरी यातून विखेंच्या वर्चस्वाबद्दलची नवी चर्चा मात्र सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील सर्व जागा भाजप-सेनेला जिंकून देण्याचा १२ विरुद्ध ० असा फॉर्म्युला जाहीर करून विखेंनी आधीच पक्षाची सूत्रे आपल्याकडे घेतली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात किमान भाजपचे उमेदवार निवडताना विखेंचा शब्द महत्त्वाचा असणार हे उघड झाले आहे. पिचडांचा भाजपप्रवेश घडवून आणत त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतही आणखी काही मंडळीचा भाजप प्रवेश होणार आहे. एकूणच विखेंनी भाजपमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. जुन्या आणि नव्या नेते-कार्यकर्त्यांनी त्यांना स्वीकारले आहे. पक्षाचे कार्यालय आणि यंत्रणेवर अवलंबून न राहाता विखे स्वतंत्र यंत्रणा राबवून काम करताना दिसतात. त्यांच्या भाजप प्रवेशाला सुरुवातीला अनेकांचा विरोध होता. आता त्यातील बहुतांश जणांचा मावळला आहे, तर अनेकांनी नाइलाज म्हणून त्यांना स्वीकारले आहे. काहींनी आपली गटबाजी मजबूत करण्यासाठी विखेंचा आधार घेतल्याचेही दिसून येते. त्यातून पक्षातील गटबाजीला नवे वळणही मिळाले आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि विखे यांच्यातील सुप्त संघर्षही अधूनमधून दिसून येतो. विशेषत: जिल्हा परिषदेच्या राजकारणात तो अधिक ठळक दिसून आला. जिल्हा विभाजनाच्या मुद्यावरही दोघांचे अद्याप एकमत झालेले नाही. शिंदे यांनी मांडलेल्या या मुद्याला विखे थेट विरोध करीत नाहीत किंवा समर्थनही करीत नाहीत. पण सूचक वक्तव्ये मात्र करून दोघांत सारे काही आलबेल नाही, हेही स्पष्ट करीत आहेत.
................
दु:ख सारून तयारीत सक्रिय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या रविवारी नगर जिल्ह्यात येत आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. मात्र, त्याचे दु:ख बाजूला सारून ते यात्रेच्या तयारीत सक्रिय झाले आहेत. दोघे पिता-पुत्र सध्या जिल्हाभर फिरून नियोजन करीत आहेत. पक्षावर आणि जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत करण्याची संधी ते सोडत नसल्याचे दिसून येते.
...............