नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातील आरोपी काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष भानुदास एकनाथ कोतकर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. कोतकरच्या जामिनाबाबत सरकार पक्षाने म्हणणे मांडावे, अशी नोटीस न्यायालयाने काढली आहे. पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला ठेवण्यात आलेली आहे.
केडगाव येथील संजय कोतकर, वसंत ठुबे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात भानुदास कोतकर याला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात 'सीआयडी'ने दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर भानुदास कोतकरला जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ ऑगस्ट २०१८ रोजी जामीन मंजूर केला होता. कोतकरचा जामीन रद्द व्हावा, असा फौजदारी अर्ज गुन्ह्यातील फिर्यादी संग्राम संजय कोतकर यांनी अॅड. एन. बी. नरवडे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेला आहे. या अर्जावर सुनावणी होऊन याप्रकरणी सरकारी पक्षाने म्हणणे मांडावे, अशी नोटीस न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी काढली आहे.