नगर : 'नगर जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यास राज्य सरकार प्राधान्य देईल. निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक अकराशे कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात येऊन येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण केली जातील,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे केले.
नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांतील प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, किरण लहामटे, मोनिका राजळे उपस्थित होते.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली; तसेच त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. 'निळवंडे धरण महत्त्वाचे असून, तेथील कालव्यांचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारने हे काम करण्यास प्राधान्य दिले आहे. या कामासाठी अकराशे कोटी रुपये उपलब्ध करून देऊन दोन वर्षांत कामे पूर्ण केली जातील,' असे त्यांनी स्पष्ट केले. 'नगर शहर विकासाच्या दृष्टीने एमआयडीसीच्या विस्तारीकरणाची गरज आहे. त्यानंतर परिसरात जमिनीची उपलब्धता पाहून हे विस्तारीकरण केले जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि नगर येथील उपकेंद्र कार्यान्वित करण्यासंदर्भात मागणी आहे. याचा निर्णय एका आठवड्यात घेऊन त्याबाबत शासन निर्णय काढला जाईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
...........