मान्सूनच्या आगमनामुळे शेतीकामांसाठी जनावरे घरी नेण्यास सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, नगर
पावसाचे आगमन झाल्याने शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांनी आपली जनावरे छावणीतून नेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील ४८ चारा छावण्या बंद झाल्या आहेत. सोमवारअखेर (२४ जून) जिल्ह्यामध्ये ४५२ चारा छावण्या सुरू होत्या. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास चारा छावण्यांची संख्या आणखी कमी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे खरीप व रब्बीचा हंगाम वाया गेला आहे. दुष्काळामुळे तीव्र चाराटंचाई निर्माण झाल्यामुळे जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने चारा छावण्या सुरू करण्यासंबंधीची घोषणा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फेब्रुवारीपासून चार महिन्यांच्या कालावधीत ५११ चारा छावण्यांना अटी व शर्तींसह मंजुरी दिली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ५०४ चारा छावण्या सुरू झाल्या होत्या. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनानंतर जामखेड तालुक्यातील तीन, शेवगाव तालुक्यातील दोन व नगर तालुक्यातील एक अशा एकूण सहा छावण्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे चारा छावण्यांची संख्या ४९८ वर आली होती; मात्र, पुन्हा पाऊस लांबल्याने आणखी दोन चारा छावण्या वाढल्या. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार शनिवार (२२ जून) रोजी नऊ तालुक्यांमध्ये तब्बल ५०० चारा छावण्यांमध्ये ४३ हजार २३३ लहान व २ लाख ८५ हजार ३१९ मोठी, अशी एकूण ३ लाख २८ हजार ५५२ जनावरे दाखल होती; मात्र, २२ जून ते २४ जून या कालावधीमध्ये जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. पाथर्डी, शेवगाव, कोपरगाव या तालुक्यांतील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली. या पावसाच्या आगमनानंतर मात्र शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांनी आपली जनावरे छावणीतून नेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोनच दिवसांत जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या ४८ ने कमी झाली आहे. त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील २९, जामखेड तालुक्यातील ५, कर्जत तालुक्यातील १ व शेवगाव तालुक्यातील १३ चारा छावण्यांच्या समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्या सोमवारअखेरच्या (२४ जून) अहवालानुसार जिल्ह्यामध्ये सध्या ४५२ चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये लहान ३६ हजार ९६१, मोठी २ लाख ५५ हजार ९३६, अशी एकूण २ लाख ९२ हजार ८९७ जनावरे दाखल आहेत.
२४ जून अखेर जिल्ह्यातील चारा छावण्यांची स्थिती :
तालुका छावण्यांची संख्या दाखल जनावरे
नगर ६६ ५१ हजार ३२८
जामखेड ६० ४० हजार ३९४
पारनेर ४१ २९ हजार ५८४
कर्जत ९६ ६१ हजार ४५५
पाथर्डी ७८ ४४ हजार ९०६
श्रीगोंदा ५६ ३२ हजार ७३०
शेवगाव ५० २७ हजार ६१३
नेवासा १ ४७३
संगमनेर ४ ४ हजार ४१४
.................
तीन दिवसांत साडेसातशे मिमी पाऊस
जिल्ह्यात २२ ते २४ जून या काळात ७५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये २२ जून रोजी ४६५ मिलिमीटर, २३ जून रोजी ११६ मिलिमीटर व २४ जून रोजी १७६ मिलिमीटर पाऊस पडला. जून महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत अकोले तालुक्यात १५४ मिलिमीटर, कोपरगाव तालुक्यात १७५ मिलिमीटर, पाथर्डी तालुक्यात १२१ मिलिमीटर व श्रीगोंदे तालुक्यात १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, पारनेर तालुक्यात सर्वांत कमी केवळ २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
........