नोंदी ठेवण्याच्या ग्रामपंचायतींना सूचना
म. टा. प्रतिनिधी, नगर
जिल्ह्यात भटक्या श्वानांची समस्या वाढत आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी आता तालुकास्तरावर देखरेख समिती स्थापन करण्यात येणार आहे. पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या नियुक्त केल्या जाणार आहेत. जिल्हा देखरेख समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत आदेश देण्यात आले.
जिल्ह्यात श्वानदंशाच्या घटना वाढत आहेत. रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्यात श्वानांना सहज खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे या श्वानांच्या संख्येत वाढ होत आहे. या श्वानांचा नागरिकांना त्रास होत आहे. यातून श्वानदंशाच्या घटना वाढत आहेत. आरोग्य केंद्रात दररोज चार ते पाच श्वानदंशाचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकारी सांगतात. एकूणच श्वानांची समस्या वाढली आहे. त्यामुळे भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करणे, या श्वानांची नोंदणी करणे, मानव-कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करणे यासाठी तालुकास्तरावर देखरेख समिती नियुक्त करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने कार्यवाहीस सुरुवात केली आहे. त्यामुळे आता लवकरच तालुका स्तरावर समिती नियुक्त करण्यात येणार आहे. या समितीने उपाययोजना करुन याबाबत आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर दर महिन्यास अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत.
--
पाळीव श्वानांची नोंदणी
जिल्ह्यातील पाळीव श्वानांची नोंदणी ग्रामपंचायतींकडे करण्याबाबत २०१८ मध्ये निर्णय घेण्यात आला होता. या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. गावातील पाळीव श्वानांची नोंदणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागास देण्यात आल्या आहेत. यामध्ये श्वानांची सर्व माहितीची नोंद करण्यात येणार आहे.