अ‍ॅपशहर

‘जागरूक’तर्फे गणेश मंडळांसाठी स्पर्धा

वॉर्डांतील खड्डे बुजवण्यासह मंडप नियमांचे पालन, उत्सव काळात कमीतकमी एक दिवस तरी वॉर्डात स्वच्छता मोहीम, कमी आवाजाचे ध्वनिक्षेपक, देखाव्यांतून माणुसकीचा संदेश, परिसरातील वाहतुकीचे स्वतःहून नियंत्रण, पारंपरिक वाद्यांच्या आवाजात मिरवणूक अशा विविध नियमांची अंमलबजावणी करतांना सार्वजनिक गणेश मंडळांचा कस लागणार आहे.

Maharashtra Times 21 Aug 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम competition for ganesh mandal
‘जागरूक’तर्फे गणेश मंडळांसाठी स्पर्धा

वॉर्डांतील खड्डे बुजवण्यासह मंडप नियमांचे पालन, उत्सव काळात कमीतकमी एक दिवस तरी वॉर्डात स्वच्छता मोहीम, कमी आवाजाचे ध्वनिक्षेपक, देखाव्यांतून माणुसकीचा संदेश, परिसरातील वाहतुकीचे स्वतःहून नियंत्रण, पारंपरिक वाद्यांच्या आवाजात मिरवणूक अशा विविध नियमांची अंमलबजावणी करतांना सार्वजनिक गणेश मंडळांचा कस लागणार आहे. स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात व्हावी, या उद्देशाने येथील जागरूक नागरिक मंचाने शहरातील गणेश मंडळांसाठी आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या तीन विजेत्या मंडळांना अनुक्रमे अकरा, सात व पाच हजाराची बक्षिसे दिली जाणार आहेत.
सर्वांची मानसिकता, सामाजिक भान व देशप्रेमामध्ये सुधारणा होऊन दुसऱ्या कुणाचीही वाट न पाहता आपल्या स्वत:पासूनच परिवर्तनाची सकारात्मक सुरुवात व्हावी तसेच तरुणांचे नैतिक प्रबोधन व्हावे आणि निव्वळ आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद टाळून उत्साहाने उत्सव साजरा व्हावा, यासाठी जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे व अन्य सदस्यांच्या पुढाकाराने यंदाच्या गणेशोत्सवात ‘चला, आपणच बदलवू सारं काही’ ही स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्पर्धा सर्व गणेश मंडळांसाठी विनामूल्य खुली आहे. स्पर्धेत सहभागी मंडळांनी निकषानुसार केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून विजेते निश्चित केले जाणार आहेत. या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वागत झेरॉक्स (जुन्या कोर्टासमोर), विजय झेरॉक्स (वाडिया पार्क समोर) व टेस्टी बाईट (म्युनिसिपल गाळा, प्रोफेसर कॉलनी) येथे उपलब्ध आहेत. गणेशोत्सवासारखा पवित्र सण जवळ आला की आनंद होण्याऐवजी संवेदनशील नागरिकांकडून नाराजी व चिंता व्यक्त होते. कारण आधीच अरुंद असलेले रस्ते अडवून टाकले जाणारे मंडप, ढोल-पथकाच्या सरावाच्या नावाखाली होणारे रात्री उशिरापर्यंत होणारे ध्वनिप्रदूषण, दहा दिवस प्रचंड आवाजात सुरू असलेली देखाव्यांची कॉमेंट्री, चोरून घेतले जाणारे लाईट कनेक्शन आदींसह अन्य प्रकारांमुळे विघ्नहर्त्याचे आगमनच एक विघ्न वाटू लागले असल्याने हा उत्सव आनंदोत्सव व्हावा, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केल्याचे मंचाद्वारे सांगण्यात आले. यानिमित्ताने वॉर्डांतील मूलभूत समस्या सुटाव्यात, खड्डे दुरुस्ती व्हावी, कचरा सफाई होऊन स्वच्छता राखली जावी व जातीयद्वेष कमी होऊन समाजात एकोपा वाढण्याची अपेक्षाही व्य़क्त करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज