अ‍ॅपशहर

ठेकेदारीचा वाद पोलिसांत

महापालिकेची विकास कामे व त्यासाठी ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हे आहेत. मनपाच्या कोणत्याही कामाची ई-टेंडरिंगद्वारे जरी निविदा प्रक्रिया होत असली तरी ‘जवळचे’ व ‘लांबचे’ ठेकेदार ठरवून त्यानुसार प्राधान्यक्रम देण्याच्या प्रकारातून वाद निर्माण होत असून, दलित वस्ती सुधार योजनेतील अशाच एका कामाचा वाद थेट पोलिस दरबारी दाखल झाला आहे.

Maharashtra Times 28 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम contracting disputein in police
ठेकेदारीचा वाद पोलिसांत

महापालिकेची विकास कामे व त्यासाठी ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हे आहेत. मनपाच्या कोणत्याही कामाची ई-टेंडरिंगद्वारे जरी निविदा प्रक्रिया होत असली तरी ‘जवळचे’ व ‘लांबचे’ ठेकेदार ठरवून त्यानुसार प्राधान्यक्रम देण्याच्या प्रकारातून वाद निर्माण होत असून, दलित वस्ती सुधार योजनेतील अशाच एका कामाचा वाद थेट पोलिस दरबारी दाखल झाला आहे. संबंधित ठेकेदाराने पोलिस अधीक्षकांकडे याची तक्रार केली असली तरी त्याच्या चौकशीत काही तथ्य आढळले तर गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची विकास कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेकेदाराने नोंदणी करणे शासकीय नियमाने अपेक्षित मानले जाते. मात्र, अशी नोंदणी असली तरी नगर मनपाची विकास कामे करण्यासाठी मनपाच्या दप्तरी स्वतंत्र ठेकेदारी कामे करण्याबाबत नोंदणी करावी लागते. असे
सुमारे ३० ठेकेदार मनपाच्या रजिस्टरवर आहेत. त्यांच्यामध्येच मनपाची सर्व कामे वाटून घेण्याची पद्धत आहे. प्रशासनातील काही घटकांसह आतापर्यंतच्या बहुतांश सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया अव्याहत सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, ई-टेंडरिंग प्रकाराने मनपाची कामे करण्यास बाहेरचे वा स्थानिक स्तरावरीलही काही नवे ठेकेदार निविदा भरू लागल्याने या नेहमीच्या रिंगणाबाहेरील अनाहूत मंडळींना साम-दाम-दंड-भेद अशा सर्व नीतींचा अवलंब करून रोखण्याचा प्रयत्न होतो. अशाच एका प्रकरणाचा वाद मात्र आता वाढू लागला आहे. संबंधित ठेकेदाराने थेट आयुक्तांसह पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार केल्याने हा विषय गाजण्याची चिन्हे आहेत.

धमक्यांची तक्रार

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत गटार व पेव्हींग ब्लॉकच्या सुमारे ११ लाखाच्या कामासाठी येथील आनंद पुंड या ठेकेदाराने तीन निविदा भरल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आवश्यक बँक गॅरंटीसह व या कामांच्या अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा कमी किमतीत ही कामे करण्याची तयारी दाखवली आहे. यातून मनपाचा आर्थिक फायदाच होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, ही ऑनलाईन भरलेली निविदा मागे घ्यावी म्हणून काहीजणांकडून दमबाजी होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संबंधित काम करण्यास असमर्थ असल्याचे पत्र देण्य़ाबाबत दबाव आणला जात असून, माझी संबंधित निविदा उघडली जात नाही तसेच माझ्या निविदेतील त्रुटींच्या पूर्ततेबाबत मला पत्र पाठवल्याचे सांगितले जाते, पण संबंधित पत्र माझ्यापर्यंत पोचलेले नाही तसेच मनपाच्या रजिस्टरवर असे पत्र मला मिळाल्याची पोच माझ्या नव्हे तर अन्य कोणाच्या तरी सहीद्वारी दिली गेल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुंड यांनी दमबाजीबद्दल पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली असून, मनपाच्या बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वर्तनाची तसेच खोटी सही करून पोच घेतल्याच्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे. या प्रकाराची महापालिकेतील ठेकेदारांमध्ये चर्चा सुरू आहे. पोलिस व मनपा आयुक्त याबाबत काय कारवाई करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज