नगर : प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. यंदा खरीप हंगामातही ही योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी मात्र ऐच्छिक आहे. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यामध्ये हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्याने होणारे नुकसान, पिकांच्या हंगामात हवामान प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्री वादळ, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग या संकटांमुळे उत्पन्नात येणारी घट, नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे काढणीपश्चात होणारे नुकसान याचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. राज्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सुर्यफूल, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.