सुरक्षा, माहिती मिळवणे, वस्तू निवड व मते ऐकवण्याचा अधिकार देणाऱ्या चार हक्कांना जगन्मान्यता मिळाल्याने १५ मार्च जागतिक स्तरावर जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा होतो. या दिनाच्या निमित्ताने देशातील ग्राहक जागरूक राहिले, तर त्यांचे कार्यच राष्ट्रनिर्माणात योगदान ठरणार आहे.
रणजित श्रीगोड
.............
ग्राहक या शब्दाचा अर्थ ग्रहण करणारा. म्हणजे एखादी वस्तू अथवा सेवेचा उपयोग घेणारा तो ग्राहक असा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी 'कौटीट कौटिलीय अर्थशास्त्र' ग्रंथात या शब्दाचा अर्थ सापडतो. आर्य चाणक्याच्या काळात ग्राहक या घटकाला समाजात फार महत्त्वाचे स्थान दिले जात होते, असे पुरावे या ग्रंथात सापडतात. त्या काळात एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली, तर कडक कायदे निर्माण करण्यात आले होते. फसवणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला फाशी देण्याचीही तरतूद होती.
जन्माला आला तो ग्राहकच आहे. त्याला आपल्या समस्या मांडण्याचे व्यासपीठ नव्हते. ही बाब अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी ओळखली. त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात ग्राहकांना संरक्षण देण्यासंदर्भात जाहीरनाम्यात वचन दिले व १५ मार्च १९६२ मध्ये अमेरिकी संसदेत भाषण केले. अमेरिकी काँग्रेसपुढे ग्राहकांची सनद मंजूर केली व जनतेला चार हक्क प्रदान केले. त्यात १) ग्राहकांना सुरक्षितेचा हक्क, २) ग्राहकांना माहिती मिळविण्याचा हक्क, ३) ग्राहकांना वस्तू निवडीचा हक्क, ४) आपली मते ऐकून घेण्याचा हक्क. या हक्कांच्या सनदेला जगात मान्यता मिळाली म्हणून १५ मार्च जागतिक ग्राहक दिन साजरा होतो. एखाद्या मोटारीच्या उत्पादनात काही खोट असली आणि त्यामुळे चालक-मालक आणि प्रवास करणारे यांना अपघात झाला, तर चूक चालविणाऱ्यांची आहे, असे म्हणून उत्पादक कंपनी हात झटकून मोकळी होत असे. हे असे घडले ते अमेरिकी सिनेट सदस्यांनी सिद्ध केले. त्यानंतर अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई मिळू लागली. त्याचा परिणाम जगप्रसिद्ध कंपनीने ग्राहकांना योग्य नसणाऱ्या हजारो मोटार गाडी बाजारातून मागे घेतल्या.
युनायटेड नेशनने ग्राहक सदस्यांची मार्गदर्शक तत्त्वे त्यानंतर जाहीर केली. त्यानंतरच्या काळात १) तक्रार निवारणाचा हक्क, २) मूलभूत गरजा भागवल्या जाण्याचा हक्क, ३) ग्राहक शिक्षणाचा हक्क व ४)आरोग्यपूर्ण पर्यावरणाचा हक्क या चार हक्कांची आणखी भर पडली. हे जॉन केनेडी यांनी दिलेल्या आश्वासनाचे फलित आहे. जन्माला आला तो ग्राहकच आहे. कोणा एका विशिष्ट जनसमुदायाला नव्हे, तर तमाम जनतेला कवेत घेणारा हा जागतिक ग्राहक दिन आहे. १५ मार्च हे या दिनाचे महत्त्व ठरले. याचे महत्त्व ज्या देशांना समजले, त्यांनी आपापल्या देशात ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षणाचे कायदे संसदेत तयार केले.
भारतात २४ डिसेंबर रोजी ग्राहक चळवळीचे जनक व संस्थापक बिंदूमाधव जोशी यांच्या परिश्रमाने भारताच्या लोकसभा अधिवेशनात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हा ग्राहक संरक्षणाचा कायदा संमत केला. तो दिवस आपल्या देशातील ग्राहकांचा विजयी दिवस ठरला. या ऐतिहासिक २४ डिसेंबर रोजी सर्व तहसील, जिल्हा कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. आजही भारताचा ग्राहक संरक्षणाचा कायदा जगात सर्वश्रेष्ठ समजला जातो. उचित नफा व उत्पादन खर्च यावर त्या वस्तूची वसुली किंमत असावी, अशी भूमिका महत्त्वाची ठरते. त्यासाठी जागरूक ग्राहकांची गरज आहे.
१५ मार्च जागतिक ग्राहक दिन व २४ डिसेंबर हे दोन दिवस सर्वच शासकीय स्तरावर व विविध ग्राहक पंचायत, ग्राहक संघटना साजरे करताना खऱ्या अर्थाने ग्राहकांनी एकत्रित येऊन सहभागाने समाजात जनजागृती निर्माण करण्याची गरज वाटते. शासकीय स्तरावरदेखील या दोन ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास उत्सवी स्वरूप येऊ नये. परिपत्रकानुसार कार्यक्रम करताना त्यात नावीन्य असावे, पण मुख्य ग्राहक जनजागृतीला जास्त महत्त्व दिले जावे. यापुढील काळात जागरूक ग्राहक निर्माण करून राष्ट्रनिर्माणासाठी त्यांचा सहभाग वाढवण्याच्या कार्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिक, अधिकारी, न्यायाधीश ग्राहकच आहेत. त्यामुळे १५ मार्चच्या जागतिक ग्राहकदिनी त्यांची जागृती व त्यांचा राष्ट्रनिर्माणातील सहभाग सर्वांनीच महत्त्वाचा मानला पाहिजे.
(लेखक ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष व श्रीरामपूर प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आहेत)
.........