निकृष्ट कामाचा दावा; आयुक्तांकडे चौकशीची मागणी
म. टा. प्रतिनिधी, नगर
केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत सुमारे १३२ कोटींच्या निधीतून नगर शहरात सध्या होत असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांवर भाजपच्या उपमहापौर मालन ढोणे यांनीच आक्षेप घेतला आहे. त्यांच्या प्रभाग ९ मधील लालटाकी रोड-देशमुखवाडीमध्ये या योजनेचे झालेले काम निकृष्ट असल्याने त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना पत्र देऊन केली आहे.
अमृत योजनेअंतर्गत नगर शहरात भूमिगत गटारीचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. या गटारी थेट सीना नदी पात्रापर्यंत नेल्या जाणार आहेत व तेथून नदीपात्रातून मोठ्या पाईपांद्वारे शहरभरातील घाण पाणी सोलापूर रस्त्यावरील फराहबक्ष महालाजवळील मनपाच्या प्रस्तावित मलनिःसारण प्रकल्पात नेऊन त्यावर पुनर्वापर प्रक्रिया केली जाणार आहे. नंदूरबार येथील ड्रीम कन्स्ट्रक्शन्सद्वारे हे काम केले जात आहे व यावर प्रकल्प व्यवस्थापन संस्था म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम पाहात आहे. पण या कामावर आता उपमहापौर ढोणे यांनीच आक्षेप घेतल्याने या कामांचा दर्जा संशयात सापडला आहे. त्यामुळे आयुक्त भालसिंग यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
रस्ताच खचला
भुयारी गटार योजनेअंतर्गत प्रभाग ९मधील लालटाकी रोड-देशमुखवाडी येथे दीडशे एमएम व्यासाचे एचडीपीई पाइप टाकले गेले आहेत. ही पाइपलाइन सरळ रेषेत न टाकता तिरपी व खाली-वर टाकली गेली आहे. त्यावर बांधलेले ड्रेनेज चेंबरही निकृष्ट आहे. त्याचे प्लास्टर निघाले आहे व ते जागीच खचलेही आहे. हे काम करताना जेसीबीचा वापर करून खड्डे करताना भूमिगत वायर व पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनही फुटली आहे. तसेच गटारींच्या पाईपाखाली मुरुम टाकला गेला नसल्याने व फक्त त्यावर माती जेसीबीद्वारेच ढकलली गेली असल्याने पावसामुळे हा रस्ता खचला आहे, असे ढोणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या कामाची तातडीने महापालिका अभियंत्यांद्वारे तपासणी केली जावी व निकृष्ट कामाबाबत ठेकेदार संस्थेवर कारवाई केली जावी तसेच यापुढे या योजनेचे निकृष्ट काम होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी याद्वारे सुचवले आहे.
--
सर्वांचेच दुर्लक्ष
शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होणे आवश्यक आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता भविष्यात अशा योजनेची कामे महापालिकेद्वारे होऊ शकणार नाहीत. संबंधित ठेकेदार संस्था निकृष्ट साहित्य वापरून काम करीत असताना त्याची पाहणी व तपासणी कोणीही करीत नाही. या कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने संबंधित संस्था उपठेकेदार नेमून हे काम करीत आहे. यामुळे शहराच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे नुकसान होऊन ती अपयशी ठरू शकते, अशी भीतीही या पत्रात उपमहापौर ढोणे यांनी व्यक्त केली आहे.
--