अ‍ॅपशहर

Sai Baba Temple Shirdi 'लॉकडाऊन' असताना 'ती' महिला साई मंदिरात; फेसबुक लाइव्ह केले!

Sai Baba Temple Shirdi राज्यात लॉकडाऊनमधून काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली असली तरी अद्याप मंदिरे मात्र दर्शनासाठी खुली करण्यात आलेली नाहीत. असे असताना शिर्डीतील साई मंदिरात एका महिला भक्ताने दर्शन घेऊन त्याचे फेसबुक लाइव्ह केल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Authored byविजयसिंह होलम | Edited byगजानन सावंत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2020, 7:26 pm
अहमदनगर: ' लॉकडाऊन 'मुळे शिर्डी येथील साई समाधी मंदीर बंद असूनही एका महिलेने मंदीर परिसरात प्रवेश केला. प्रतिबंधित असलेल्या चावडी परिसरात जाऊन तेथे फोटो सेशन आणि फेसबुक लाइव्हही केले. त्यामुळे मंदीर परिसरात सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेण्यात येत नाही, अशी तक्रारी साईभक्त आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. ( Sai Baba Temple Shirdi )
महाराष्ट्र टाइम्स.कॉम साईभक्त संजय काळे यांचा या फोटोंवरून आक्षेप


वाचा: शिर्डी साई मंदिर बंदच राहील, साई संस्थानचा खुलासा

दोन तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून फेसबुकच्या माध्यमातून माहिती मिळाल्याचे काळे यांनी सांगितले. संबंधित महिलेच्या पोस्टचे स्क्रीन शॉट्सही काळे यांनी काढून पाठविले आहेत. त्यावरून संबंधित महिलेने आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून दर्शन घेतल्याचे दिसून येते. काळे यांनी सांगितले की, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आदेशाने सर्व मंदिरे बंद करण्यात आली आली आहेत. मंदिरात केवळ नित्य स्वच्छता व दैनंदिन पूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असताना दोन दिवसांपूर्वी एक महिला भक्त शिर्डीत आली. ती थेट चावडीपर्यंत पोहचली. तिने दर्शन घेतले. तेथे या महिलेने फोटो सेशन केले, फेसबुक लाइव्हही केले. यासाठी किमान २० मिनिटांचा वेळ गेला असेल. तरीही मंदिरातील सुरक्षा कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांना कळले कसे नाही.

वाचा: केंद्र सरकारला सोने द्यायला शिर्डी संस्थान तयार

मंदिराची सुरक्षा व्यवस्था व पोलीस कोठे होते. सीसीसीटीव्हीद्वारे मंदिरावर लक्ष ठेवणारी यंत्रणा काय करीत होती. कोणीही मंदिरात प्रवेश करते, चित्रिकरण करून ते सोशल मीडियात व्हायरल करते आणि संस्थानच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पत्ताच लागत नाही, ही गोष्ट सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. कोणी दर्शन घेतले तर त्याला आपला अक्षेप नाही, मात्र जेव्हा सुरक्षेचा मुद्दा येतो, तेव्हा यंत्रणा कोठे असते, याकडे लक्ष वेधण्याचा माझा हेतु आहे, असेही काळे यांनी म्हटले आहे. मंदिराच्या सुरक्षेतील ढिसाळपणा यापूर्वीही अनेकदा उघडकीस आला आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेपाने कारवाई न होता प्रकरण दडपले जाते, अशी तक्रारही काळे यांनी केली आहे. याची गंभीर दखल घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, गुन्हे दाखल केले जावेत. लॉकडाऊनच्या काळातही पगार सुरू असलेल्यांनी सुरक्षेचे काम तरी चोख करावे, अशी भक्तांची अपेक्षा असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. रामनवमी दिवशीही सुरक्षा उपायांचा भंग झाला होता. त्याससंबंधी आपण केलेल्या तक्रारीवर अद्याप कारवाई झालेली नाही, असे काळे यांचे म्हणणे आहे.

वाचा: श्रीमंत शिर्डी संस्थान आर्थिक अडचणीत; घेणार 'हा' निर्णय
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज