अ‍ॅपशहर

दिवाळीत भाडेवाढीचा दणका

दिवाळी सणात गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांना प्रवासी सेवा देण्याबरोबरच एसटीने भाडेवाढही जाहीर केली आहे. महामंडळाने यावेळी विशिष्ट दिवशीच भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Times 22 Oct 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम diwali st fares hike
दिवाळीत भाडेवाढीचा दणका

दिवाळी सणात गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांना प्रवासी सेवा देण्याबरोबरच एसटीने भाडेवाढही जाहीर केली आहे. महामंडळाने यावेळी विशिष्ट दिवशीच भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून (२२ ऑक्टोबर) लागू होणारी भाडेवाढ २५ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर पुन्हा २८ पासून भाडेवाढ केली जाणार आहे. दिवाळीसाठी जादा बसेस सोडल्या जात आहेत. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सनेही दिवाळीत भाडेवाढ केली आहे. नगरमधून पुण्याला जाण्यासाठी तब्बल तीनशे रुपये घेतले जात आहेत.
दिवाळी चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीसाठी गावाकडे जाण्यासाठी बसस्टँडवर प्रवाशांची गर्दी होत असते. प्रवाशांची होणारी गर्दी पाहता भरमसाठ भाडेवाढ केली जाते. या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट होत असते. लांबच्या अंतरासाठी प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सला पसंती दिली जाते. या काळात ट्रॅव्हल्स फुल झालेल्या असतात. त्यामुळे त्यांच्याकडून भाडेवाढ केली जात आहे. नगरवरुन पुण्यास जाण्यासाठी तीनशे ते साडे तीनशे रुपये घेतले जात आहेत. बसस्टँडच्या बाहेरच या ट्रॅव्हल्स उभ्या असतात. येथून प्रवाशांची पळवापळवीही नित्याचीच झाली आहे. एसटी महामंडळाकडून या प्रकारांवर काहीच कारवाई होत नसल्याने एसटीचा तोटा होत आहे.

टप्प्याटप्याने भाडेवाढ

दिवाळीसाठी एसटीनेही परिवर्तनशील भाडेवाढ जाहीर केली आहे. २१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्प्याने भाडेवाढ केली जाणार आहे. यामध्ये २२ ते २४ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, ५ व ६ नोव्हेंबर आणि १२ ते १४ नोव्हेंबर या दिवशी ही भाडेवाढ केली जाणार आहे. यावेळच्या प्रवासीभाड्यात साधारण दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. बसस्टँडवर प्रवाशांसाठी जादा बसेसचेही नियोजन करण्यात आल्याचे एसटीच्या विभागीय कार्यालयातून सांगण्यात आले.

वाहतूक कोंडी

दिवाळीच्या काळात स्वस्तिक बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. बसेसच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. त्यामुळे या भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. बसस्थानकाच्या बाहेरच खासगी ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात आहेत. त्यातूनही बसला स्थानकात प्रवेश करताना अडचणी येत आहेत. बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक व इतर अधिकारी या प्रकारांवर काहीच कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे या निटनेटक्या बसस्थानकालाही आता बकाल रुप येत आहे.

‘ट्रॅव्हल्स’ची मनमानी

दिवाळीतील वाढत्या गर्दीमुळे ट्रॅव्हल्स चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. दिवाळीच्या काळात तर भाडेवाढ केलीच आहे. परंतु, दिवाळीनंतरच्या चार ते पाच दिवसांत या भाड्यात दुपटीने वाढ केली जाणार आहे. आजच्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी सहाशे ते सातशे रुपये घेतले जातात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र तब्बल हजार ते बाराशे रुपये भाडे घेतले जाणार असल्याची माहिती आहे. प्रवाशांची संख्या व ट्रॅव्हल्समधील उपलब्ध जागा यावरुन ट्रॅव्हल्सचालक भाडेवाढ करत असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज