संतप्त आंदोलकांच्या मोर्चादरम्यान तीव्र भावना
म. टा. वृत्तसेवा, जामखेड
सर्वच शेतकऱ्यांना या सरकारने फसविले आहे. शेतकऱ्यांवर प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करण्याची वेळ आणली आहे. पूर्वी शेतकऱ्यांवर पिकत नव्हते म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येत होती, आता विकत नाही म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
सरकारने शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे या मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिव्हाळा फाउंडेशन, स्वभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. याची सुरुवात खर्डा चौकातून सोमवारी (३ सप्टेंबर) दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली. मोर्चात जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, प्रा. मधुकर राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ऋषीकेश डुचे, लक्ष्मण कानडे, शहाजी डोके, अवधूत पवार, रमेश आजबे, शेरखान पठाण, भानुदास बोराटे, दत्तात्रय विष्णू वारे, नामदेव राळेभात, सिद्धार्थ घायतडक, गुलाब जांभळे, रामचंद्र इंगळे, विठ्ठल अण्णा राऊत, झीक्रीचे सरपंच चंद्रकांत साळुंके, गणेश हगवणे, डॉ. कैलास हजारे, भीमराव पाटील, अमित जाधव, कुंडल राळेभात, राजू वारे, अमोल गिरमे, संभाजी ढोले, लक्ष्मण औसरे महाराज, शिवाजी सातव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला.
सरकारने हमीभाव केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले असले तरी हमीभाव केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरू झाले नाही तर विक्रीसाठी आणलेला तालुक्यातील सर्वच उडीद तहसील कार्यालयात उतरवून टाकू. तसेच उडीद खरेदी शासन निर्णय ज्या अधिकाऱ्यांनी पारीत केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ज्या गावांमध्ये माल आहे त्याच गावातील आडत दुकानाच्या व्यापाऱ्यांनी माल घेतला पाहिजे; मात्र, तसे होत नाही. आम्ही व्यापाऱ्यांच्या विरोधात नसून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आहोत. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी सरकारने कायदा केला आहे, तो प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, त्यामुळे सरकारची ही घोषणा फसवी आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवरच गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केली. हे तुघलकी सरकार शेतकरीविरोधी असल्याने आता यांना घालविण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील गावागावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. तब्बल पाच तासानंतर या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
चौकट :
विक्रीचा उडीद तहसीलमध्ये
व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांचा उडीद कोणी खरेदी करत नाही. तसेच सरकारने हमीभाव केंद्रदेखील सुरू केले नाही. म्हणून मोर्चा दरम्यान विक्रीसाठी आणलेला उडीद शेतकऱ्यांनी चक्क तहसील कार्यालयात आणून टाकून सरकारचा निषेध केला. तसेच उडीद खरेदी केंद्र सुरू न केल्यास या पेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला.
फोटो ओळ :
शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता.