नगर : 'सध्या दूध व ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादनाचे साधन आहे. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दूध संघ अडचणीत येत आहेत,' असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. 'सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर केले. मात्र, तीन महिन्यांत केवळ वीस दिवसांचेच अनुदान दिले. अनेक खासगी दूध संघ दुधाला सतरा ते अठरा रुपये असा भाव देत आहेत. त्यांच्यावर सरकारचे कोणतेही बंधन नसून, सरकारने दूध व्यवसायाला मदत करणे गरजेचे आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिरापूर येथे संगमनेर तालुका सहकारी दूध संघ व दूध सागर सहकारी दूध संस्था यांच्या वतीने 'गायपोळा' उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी थोरात बोलत होते. कार्यक्रमाला बाजीराव खेमनर, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लक्ष्मण कुटे, शिवाजी थोरात, आर. बी. राहाणे, रामहरी कातोरे, नानासाहेब गुंजाळ, सुरेश थोरात, अॅड. नानासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे, कैलास पानसरे, मोहन करंजकर, डॉ. प्रताप उबाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते खांडगेदरा परिसरातील गायीचे पूजन करण्यात आले; तसेच राजहंस गो-सिद्धी योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
'सरकारने निवडणुका आल्या म्हणून घोषणा सुरू केल्या आहेत. मात्र, मागील चार वर्षांत निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी एक रुपयाचाही निधी भाजप सरकारने दिला नाही,' अशी टीकाही थोरात यांनी केली. रणजितसिंह देशमुख म्हणाले, 'यावर्षी अत्यंत अडचणीची परिस्थिती असतांनाही दूध संघाने पंचवीस कोटी रुपयांची अनामत, रिबेट शेतकऱ्यांना अदा केले आहे. दूध संघाच्या वतीने गायींच्या आरोग्यासाठी जंत निर्मूलन, विविध लसीकरण सातत्याने केले जात असून, या लसीकरणासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जात आहे. गायींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गो-सिद्धी ही नवी योजना सुरू करण्यात येत आहे.' कार्यक्रमाला परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
......