बेलापूर बदगीत १५० वर्षांची अन्नदानाची परंपरा
म. टा. वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावातील निसर्गपूजक संत रामदास बाबांच्या १५०व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गावातील नऊशे घरांत बाबांची प्रतिमा असलेली चांदीची नाणी वाटण्यात आली. तर गावाने चार लाख रूपयांचा मसाला वापरून ११ हजार लिटर आमटी बनवली. नऊशे घरांतून सरासरी दोनशे चपात्या याप्रणाणे दीड लाख चपात्यांचा महाप्रसाद केला.
बेलापूर बदगी गावात गेली १५० वर्षे अन्नदानाची एक अनोखी परंपरा सुरू आहे. दीडशे वर्षांपूर्वी बेलापूर गावात कच नदीच्या काठावर योगी रामदासबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. ते ध्यान धारणा, गोपालन, वृक्षसंवर्धन करीत. उतारवयात त्यांनी गावात संजीवन समाधी घेतली. समाधीपूर्वी स्वत:च्या गायी विकल्या. त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी प्रत्येक घरात एक चांदीचा रुपया दिला. त्यातून दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला आमटी, चपातीचा महाप्रसाद करण्यास सांगितले. आज गावात कुटुंबांची संख्या वाढली आहे. तरी दीडशे वर्षांची ही परंपरा गावाने कायम ठेवली आहे.
सध्या गावात नऊशे कुटुंबे आहेत. ज्येष्ठ द्वादशीला दरवर्षी हा चपाती-आमटीचा महाप्रसाद केला जातो. प्रत्येक कुटुंब कमीत कमी एक पायलीभर गव्हाच्या चपात्या महाप्रसादासाठी देते. तर काही कुटुंबे दुप्पट, तिप्पट देतात. लोकवर्गणीतून आमटी तयार होते. या कार्यक्रमासाठी लेकीबाळी, पाहुणे, बाहेरगावी नोकरी, व्यावसायास असलेले, आसपासच्या गावातील लोक जमतात. या पाच दिवसांच्या काळात मोठी गर्दी होत असल्याने गृहोपयोगी वस्तू, मिठाई, खेळणी यांची दुकाने मोठ्या संख्येने असतात.
यंदा या सोहळ्यात चार लाख रूपयांचा मसाला वापरण्यात आला. सहाशे किलो शेंगदाणा तेल वापरून ११ हजार लिटर आमटी तयार करण्यात आली. नऊशे घरातून किमान दीड लाख चपात्या देण्यात आल्या. प्रत्येक पाहुण्याला, भाविकांना आग्रहाने जेवणासाठी अमंत्रित केले जात होते. यंदा रामदासबाबांच्या १५० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गावाने लोकवर्गणीतून रामदासबाबांची प्रतिमा असलेली नऊशे चांदीची नाणी प्रत्येक घरात वाटली.