अ‍ॅपशहर

कर्जमाफीतून ९१ जणांना वगळले

कर्जमाफीसाठी शासनानेच जाहीर केलेल्या पहिल्या ३ हजार ३४७ शेतकऱ्यांच्या ग्रीन यादीतील ९१ जणांना आता शासनानेच वगळले आहे. संबंधित ९१ जणांच्या अर्जांमध्ये काही चुका आहेत. यापैकी काहींना दीड लाखांपेक्षा जास्त माफीचा लाभ मिळू शकतो, अशा काही कारणांनी त्यांचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत.

Maharashtra Times 14 Nov 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers drops from laonwaiver list
कर्जमाफीतून ९१ जणांना वगळले


कर्जमाफीसाठी शासनानेच जाहीर केलेल्या पहिल्या ३ हजार ३४७ शेतकऱ्यांच्या ग्रीन यादीतील ९१ जणांना आता शासनानेच वगळले आहे. संबंधित ९१ जणांच्या अर्जांमध्ये काही चुका आहेत. यापैकी काहींना दीड लाखांपेक्षा जास्त माफीचा लाभ मिळू शकतो, अशा काही कारणांनी त्यांचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्षात जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना व कधी कर्जमाफीचा लाभ मिळणार, याची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्हा सहकारी बँकेने सुमारे २ लाख ४८ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाला पाठवले आहेत. यातून सुमारे ८०० ते ८५० कोटींची माफी शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. शासनाने या शेतकऱ्यांपैकी ३३४७ शेतकऱ्यांची पहिली यादी बँकेला पाठवून त्यांच्या माफीसाठी १८ कोटी ११ लाख रुपयेही पाठवले आहेत. मात्र, आता या यादीतील ९१ जणांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यांना मिळणाऱ्या माफीची सुमारे ८६ लाखांची रक्कम असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत कर्जमाफीची अंतिम यादी बँकेला येत नाही, तोपर्यंत शासनाकडून आलेली रक्कम जमा करून घ्यायची नाही असे बँकेने ठरवले आहे.

सेवा संस्थानिहाय शेतकरी कर्जमाफीच्या याद्या ‘आपले सरकार’ वेबपोर्टलवर बँकेने पाठवल्या आहेत. त्यातील चुका दुरुस्त करून त्या पुन्हा बँकेकडे आल्यावर तालुकास्तरीय समितीद्वारे त्यांची तपासणी होऊन व शेतकऱ्यांच्या नावासमोर माफी रक्कम नमूद करून त्या पुन्हा शासनाकडे पाठवायच्या होत्या. त्यानंतर अंतिम यादी बँकेला देऊन संबंधितांची कर्जखाती ‘निरंक’ करण्याचे सांगितले जाणार होते व त्याचे पैसेही शासनाकडून दिले जाणार होते. मात्र, ही प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे रेंगाळल्याने आता शासनाने बँकेकडूनच नव्याने याद्या मागवल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १३९१ सेवा संस्थांच्या याद्या पुन्हा पाठवल्या गेल्या आहेत. शिवाय या याद्यांची एक्सलशीट घेऊन स्वतंत्र पथकही मुंबईला गेले आहे. त्यामुळे या याद्यांतील किती नावे अंतिम होतात व किती माफी रकमेचा लाभ संबंधितांना मिळतो, याची उत्सुकता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज