कुटुंबाचा अविभाज्य घटक बनलेल्या मोलकरणीच अडचणीत
म. टा. प्रतिनिधी, नगर
एरवी मोलकरीण आली नाही; तर घरातील महिला आणि एकूणच कुटुंबांचे हाल होत असल्याची चर्चा ऐकायला मिळायची. आता हेच घर कामगार कामावर यायला तयार आहेत, मात्र, करोनाच्या भितीने अनेकांनी त्यांचे काम थांबविले आहे. काम नाही, तर पगारही नाही, अशीच बहुतेक ठिकाणी पद्धत असल्याने घर कामगारांचे हाल सुरू आहेत.
'करोना'च्या संकटामुळे सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींना बसला आहे. कामावर गेले तरच पैसे मिळतात. त्यावरच घर अवलंबून असते. त्यामुळे त्यांना कामाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो.
सध्या अनेक लोक पुढे येऊन या वर्गासाठी मदत करीत आहे. मात्र, त्यातून पूर्णत: प्रश्न सुटलेला नाही. घरकामगार (मोलकरीण) असलेल्या महिलांना त्या काम करत असलेल्या ठिकाणाहून मात्र दुर्लक्षिततेचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. घरकाम करणाऱ्या महिलांना इतरांच्या घरी जाऊन कामे करावे लागते. सहाजिकच या परिस्थितीत त्यांची कामेही बंद आहे. घरकाम सुटले तर अन्य ठिकाणी काम करण्याचीही सध्या सोय नाही. राज्यात; तसेच शहरात लाखोंच्या संख्येने घरकाम करणाऱ्या महिला आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीत अशा महिलांचे आर्थिक नुकसान होत आहे. अनेकांकडून वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. करोनामुळे त्या काम करत असलेल्या घरांमध्ये प्रवेशही नाकारला जात असून हे संकट संपल्यावर येण्यास सांगितले जात आहे. या महिलांचे बँकांचे विविध हप्ते, खाद्यसामग्री, जीवनावश्यक वस्तू याची चिंता असल्याने या महिला मोठ्या तणावाखाली दिसून येत आहेत. घर कामगार महिला बहुसंख्य विधवा, आर्थिक दुर्बल असल्याने मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी १२ ते १५ तास काम करतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अशा घर कामगार महिलांवर संकट आल्याचे दिसून येत आहे.
संस्थांची पगार द्या मोहीम…
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मोलकरणीचे काम थांबविले असले तरी त्यांना महिन्याचा पूर्ण पगार द्यावा, यासाठी विविध संघटनांतर्फे सोशल मीडियात मोहीम सुरू आहे. माणुसकीच्या नात्याने त्यांना पगार द्यावा, असे अहवाहन केले जात आहे. त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. मात्र, बहुतांश ठिकाणी मोलकरणींचे हाल होत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंबंधी कायदे आहेत, सरकारनेही विविध आदेश काढले, आवाहन केले आहे. मात्र, त्याहीपेक्षा माणुसकी म्हणून याकडे पहायला हवे. ज्यांना आतापर्यंत आपली काळजी घेतली, सेवा दिली, त्यांना अडचणीच्या काळात वाऱ्यावर सोडू नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुरू आहे.