म. टा. प्रतिनिधी, नगर
शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर योजनेअंतर्गत तीन एचपी व पाच अश्वशक्ती क्षमतेचे सौरपंप मिळावेत, यासाठी अवघ्या दीड महिन्यात पाचशे अर्ज आले आहेत. त्यापैकी दहा जणांना महावितरणकडून कोटेशन देण्यात आले आहे. या योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांना महावितरणच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ज्या ठिकाणी आजमितीस वीज पोहोचली नाही, तेथील शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी डिसेंबरअखेर सरकारने मुख्यमंत्री सौर योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करणाऱ्याला तीन एचपी किंवा पाच अश्वशक्ती क्षमतेचे सौरपंप देण्यात येणार आहेत. तीन अश्वशक्तीच्या सौरपंपाची किंमत दोन लाख ५५ हजार रुपये, तर पाच अश्वशक्तीच्या पंपाची किंमत तीन लाख ८५ हजार आहे. या योजनेत सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांकडून पंपाच्या किमतीच्या दहा टक्के, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. परंपरागत वीजजोडणी नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टल बनविले असून, सातबारा उतारा आणि आधार कार्ड या किमान कागदपत्रांवरून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
योजनेतील लाभार्थ्यांना सौरऊर्जा संचासोबतच विद्युत मोटार संच व कंट्रोल पॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात, विद्युत चोरी या प्रकारांमुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यात निर्माण होणारे अडथळे या योजनेमुळे दूर होण्यास मदत होणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या दीड महिन्यात तब्बल पाचशे जणांनी सौरपंप मिळावेत, यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार सौरपंपाचे कोटेशन देण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
.............