अ‍ॅपशहर

'रोहित पवारांचा फॉर्मुला वापरला तर भविष्यात फक्त टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील'

ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बक्षीस जाहीर करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर माजी मंत्री राम शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे.

Authored byसंदीप कुलकर्णी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2020, 7:27 am
अहमदनगर: 'ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस म्हणजे त्यांनी लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी,' अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. 'अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील,' असा टोलाही त्यांनी पवार यांना लगावला. ते नगरमध्ये बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Pawar-Ram Shinde


वाचा: पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीची जबाबदारी पार्थ पवारांकडे?

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावात तीस लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. मात्र आता त्यावरून चांगलेच राजकारण पेटले असून माजी मंत्री शिंदे यांनी तर थेट रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिंदे म्हणाले, 'राज्य निवडणूक आयोगाची एक आचारसंहिता ठरली आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, लोकांवर दबाव तंत्र वापरणे, पैशाचा वापर करणे, हे गैर आहे. एखाद्या आमदारांनी विकासाला चालना दिली पाहिजे. विकास केला पाहिजे. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यास देखील दुमत नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार हे घटनाविरोधी बोलतात, आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. रोहित पवार यांनी जे तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, ते लोकांना प्रलोभने देणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याची सखोल चौकशी करावी. ग्रामपंचायत निवडणूक दबाव आणून ते बिनविरोध करत असतील तर ते देश हुकूमशाहीला नेण्याचे चित्र निर्माण करत आहे.
वाचा: अडीच तासांत नाशिक; आजपासून धावणार स्पेशल ट्रेन

'आज ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ते पैसे देतात, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, खासदार, आमदार यांच्या निवडणुका अशाच बिनविरोध होतील व त्यामुळे टाटा, बिर्ला हेच लोक आमदार-खासदार होतील, असा टोलाही त्यांनी पवार यांना लगावला. तरी राज्य निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यासाठी आवश्यक असेल तर समिती गठित करावी,' अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.

वाचा: करोनाचा खोटा अहवाल, विखे पाटील हॉस्पिटलच्या लॅबविरुद्ध गुन्हा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज