श्रीगोंदे : तालुक्यातील तांदळी दुमाला येथे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील तीन आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी पकडले, तर दोन दरोडेखोर पळून गेले. पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी नगर, सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमधील मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली असल्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलिस उपनिरीक्षक नीलेश कांबळे व पोलिसांचे पथक रविवारी (१९ ऑगस्ट) रात्री साडे नऊच्या सुमारास गस्त घालत असताना या पथकाला आडबाजूला एक पांढऱ्या रंगाची गाडी आढळून आली. पोलिस पिकअप वाहनाजवळ गेले असता वाहनात तीन लोक बसलेले आढळून आले. त्यांच्याकडे विचारणा करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी वाहनाची तपासणी केली असता त्यांचाकडे लोखंडी कटावणी, नायलॉन दोरी, मिरची पूड असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. तोपर्यंत वाहनाच्या बाहेर बाजूला उभे असलेले दोघेजण पळून गेले. सुरेश खंडागळे (वय २७), भाऊसाहेब साखरे (वय ४०) व दादा पोकळे (वय ३५, सर्व रा. राजुरी, ता. करमाळा) अशी पकडलेल्यांची नावे असून मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्या असल्याचे व तांदळी येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोवार यांनी सांगितले. पोलिस कर्मचारी किरण बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिन्ही आरोपींच्या विरोधात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला आहे.