अ‍ॅपशहर

मोक्कातील कुख्यात गुंड चन्या गजाआड

श्रीरामपूरमधील कुख्यात बेग टोळीचा प्रमुख चन्या उर्फ सागर अशोक बेगसह दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी गजाआड केले.

Maharashtra Times 14 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gangster chanya arrested
मोक्कातील कुख्यात गुंड चन्या गजाआड

श्रीरामपूरमधील कुख्यात बेग टोळीचा प्रमुख चन्या उर्फ सागर अशोक बेगसह दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी गजाआड केले. या टोळीविरुद्ध नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई, व नगर जिल्ह्यात दरोडे, खंडणी वसूल करणे, खून, खुनाचा प्रयत्न असे २६ गुन्हे दाखल आहेत. बेग टोळीवर मोक्कानुसार कारवाई झाली असली तरी टोळीतील काही साथीदार गेल्या अडीच वर्षांपासून फरार होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
चन्या बेगसह त्याचा भाऊ आकाश उर्फ टिप्या अशोक बेग व सागर साहेबराव शिंदे (सर्व श्रीरामपूर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून एक स्कोडा कार, एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस पोलिसांनी हस्तगत केले. तर इतर पाच साथीदार एका कारमधून पळुन गेले. नगर-दौंड रोडने अरणगाव (ता. नगर) येथून ही टोळी जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, शरद गोर्डे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर पाटील, श्रीधर गुट्टे, राजकुमार हिंगोले, भाऊसाहेब काळे, सोन्याबापू नानेकर, उमेश खेडकर यांच्या पथकाने अरणगाव येथे या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. आरोपी स्कोडाकारमधून दौंडकडून नगरच्या दिशेने येत होते. अरणगाव येथे गतिरोधकाजवळ कारचा वेग हळू झाला. त्याचवेळी पोलिसांनी या गाडी अडवून त्यातील आरोपींना ताब्यात घेतले. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या दुसऱ्या कारमधून येणारे त्यांचे साथीदार पाठीमागे वळून पुन्हा दौंडच्या दिशेने निघून गेले. अर्जून खुशाल दाभाडे, लखन प्रकाश माखिजा, सागर काशिनाथ शेटे, रितेश आसाराम काटे, सुधीर काळोखे असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.
काही वर्षांपूर्वी चन्या बेगची दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)ने चौकशी केली होती. तर २०१५ मध्ये बेग टोळीला मोक्का लावण्यात आला होता. त्यात चन्या बेगचा भाऊ सोन्या बेग इतर टोळीतील सदस्य अटकेत होते. परंतु टोळीचा प्रमुख चन्या व इतर साथीदार फरार होऊन गुन्हे करत होते. सहा महिन्यांपूर्वी नवी मुंबई येथे एक सिगारेटने भरलेला कंटेनर या टोळीने लुटला होता. यात या टोळीला मोक्का लावण्यात आला होता. २००९ पासून ते २०१५ पर्यंत या टोळीविरुद्ध नाशिक, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला अपहरण, खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार असे २६ गुन्हे दाखल आहेत. त्यातील १३ गुन्हे श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला दाखल आहेत. शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांनांही ही टोळी लुटत होती.

पोलिस स्टीकरचा वापर

चन्या बेग हा पोलिसांच्या नावाचा वापर करून राज्यभर फिरत होता. या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या स्कोडा कारच्या पुढील काचेवर महाराष्ट्र पोलिस नाव असलेले स्टीकर लावण्यात आले होते. या स्टीकरमुळे आरोपी असल्याचा संशय येत नव्हता. तसेच आरोपी चन्याकडे असलेल्या वाहनाचा परवानाही दुसऱ्याच्या नावावर आढळून आला आहे.

खंडणीच्या तक्रारी करा

चन्या बेगची टोळी श्रीरामपूरमधील व्यवसायिकांकडून खंडणी वसूल करत होती. चन्या बेग हा मध्यस्थांमार्फत या खंडण्या गोळा करत असे. या टोळीची दहशत असल्याने तक्रार करण्यास कोणी पुढे येत नव्हते, अशी माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. मात्र, आता तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज