'बुलेट ट्रेन'चे पैसे शेतकऱ्यांना द्या
रामदास कदम यांची मागणी; कर्जमाफी आमच्यामुळेच झाल्याचाही दावा
म. टा. प्रतिनिधी, नगर
'आदिवासी, धनगर, मराठे, मुस्लिम असे सगळे समाज मोर्चे काढत आहेत. समाजाचे प्रश्न भाजप सोडवत नसेल, तर यांना सत्ता काय फक्त मंत्रिपदांसाठीच पाहिजे काय?,' अशी टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी येथे केली. 'मोदी-फडणवीस बुलेट ट्रेनसाठी खर्च करणार असलेले एक लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले जावेत,' अशी मागणीही त्यांनी केली. 'शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी शिवसेनेमुळेच मिळाली,' असा दावाही त्यांनी केला.
शिवसेनेच्या वतीने येथील माउली सभागृहात वक्ता शिबिर आयोजित करण्यात आले होते. उपनेते नितीन बानगुडे व मारुती साळुंके यांची व्याख्याने या निमित्ताने झाली. या शिबिराचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार विजय औटी, महापौर सुरेखा कदम, माजी आमदार अनिल राठोड, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल कराळे आदींसह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
'शिवसेनेने नाइलाजास्तव राज्यातील भाजप सरकारला टेकू दिला आहे, आमच्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे व माझ्यामुळे प्लास्टिक बंदीही झाली आहे,' असे आवर्जून स्पष्ट करून कदम म्हणाले, 'अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडेंच्या काळात युती २५ वर्षे टिकली. पण मोदी आल्यानंतर भाजपची 'तुझे आहे ते आपण वाटून खाऊ व माझे आहे त्याला तू हात नको लावू' अशी भूमिका झाली आहे. भाजपच्या सत्तेने सर्वांना सर्व काही दिले असते, तर राज्यात कोणाचे मोर्चे निघाले नसते. नवरात्रात वीज नाही, आदिवासींचे कुपोषण होत आहे. अशा स्थितीत शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेला सत्ता हवी आहे व त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण स्वबळावर लढणार आहोत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
..............
नारायण राणेंवर टीका
वक्ता शिबिराच्या अनुषंगाने बोलताना शिवसेनेतील फर्ड्या वक्त्यांचा नामोल्लेख कदम यांनी केला. पक्षातून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांच्यासह अन्य नेत्यांवर टीकाही केली. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमोघ वक्तृत्वातून ४५ वर्षे समाजाला एक निश्चित विचार दिला. वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, दत्ता नलवडे असे अनेक वक्ते सेनेने घडवले. छगन भुजबळही सेनेतच बोलायला शिकले, त्यामुळेच त्याची जाणीव ठेवून कारागृहातून सुटल्यावर ते थेट मातोश्रीवर आले,' असे सांगून कदम म्हणाले, 'गणेश नाईक, नारायण राणे, छगन भुजबळ अशी गद्दार सेना बाहेर पडली. राणेंना साध्या शिवसैनिकापासून थेट मुख्यमंत्री केले होते. त्यांनी कोकणातून सेना संपवण्याची भाषा केली होती. पण ते म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे,' अशी टीकाही कदम यांनी केली.
.............
आम्हाला का शेंड्या लावता?
कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली. 'ते येथे असताना भाजपवर टीका करतात, पण दिल्लीत गेल्यावर मोदींच्या गळ्यात पडतात, तेथे या दोघांच्या चुंबाचुंबीने दोघांचेही गाल लाल होतात, सारे जग हे बघत असते. त्यामुळे येथे आम्हाला का शेंड्या लावता, असे लोकच त्यांना आता म्हणू लागले आहेत,' असे कदम म्हणाले.
............