म. टा. वृत्तसेवा, श्रीगोंदे
राज्यात आणि केंद्रात फसव्या घोषणा करणारे भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील आहे. हे सरकार हिटलरपेक्षाही अधिक हुकुमशाही पद्धतीने वागणारे असल्यामुळे सामान्य माणसांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. हे भाजप सरकार जाणीवपूर्वक आंधळे आणि बहिरेपणाची भूमिका बजावत असल्याची टीका महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे यांनी केली.
मंगळवारी, (दि. १७) तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने काष्टी येथे नगर-दौंड रस्त्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नागवडे बोलत होत्या. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, राज्य व केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे शेतीमालाला व दुधाला भाव देऊ शकत नाही. परदेशी दौऱ्यांत समाधान मानणारे पंतप्रधान यांना शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही. मुख्यमंत्री शेतकरी हिताचे निर्णय घेत नाहीत. मंत्री शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरतात. शेतकऱ्यांच्या पिकाला व दुधाला भाव न देणारे हे सरकार पुढील निवडणुकीत पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका नागवडे यांनी केली. या वेळी नागवडे कारखाना संचालक अरुणराव पाचपुते, राकेश पाचपुते, प्रा. सुनील माने, मेजर चांगदेव पाचपुते, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारवर टीका केली. दुधाला योग्य भाव द्यावा तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र माळी यांना देण्यात आले. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या रस्ता रोकोमुळेवाहतुकीची कोंडी झाली होती.