म. टा. वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी-कोपरगाव या शहरांना निळवंडे धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या प्रस्तावित २९८ कोटींच्या पाणी योजनेला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी स्थगिती आदेश दिल्याने हजारो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी जल्लोष केला आहे. साई संस्थानच्या पैशातून गरज नसताना शिर्डी-कोपरगाव या दोन शहरांसाठी पाणी पळविण्याचे नेत्यांचे राजकीय मनसुबे खंडपीठाच्या शुक्रवारच्या स्थगिती आदेशामुळे उधळले गेले.
शिर्डी, कोपरगाव या दोन शहरांना गोदावरी कालव्यातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी पाण्याचे आरक्षण नाशिक पाटबंधारे खात्याने दीर्घ काळापासून टाकलेले आहे. निळवंडे प्रकल्प प्रवरा खोऱ्यात येत असताना निळवंडेचे पाणी शिर्डी-कोपरगावला नेण्याचा घाट घातला गेला. साई संस्थानाच्या तिजोरीतील पैशाने २९८ कोटींची पाणी योजना आखण्यात आली. त्यासाठी साई संस्थाने सरकारकडे प्रस्ताव पाठविला. शिर्डी व कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी त्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून या पाणी योजनेला मंजुरी मिळविली होती. आमचे हक्काचे पाणी पळविले जात असल्याने पाण्यापासून वंचित शेतकऱ्यांनी गावोगावी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही तळेगाव येथे आंदोलन करून शिर्डी-कोपरगावला निळवंडे धरणातील पाण्याचा एक थेंब जाऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. कोपरगाव, शिर्डी या शहरांना गोदावरी कालव्यातून पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यासाठी पाण्याचे आरक्षण आहे असे असतांना प्रवरा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा घाट कशासाठी? निळवंडेचे पाणी जिरायत शेतकऱ्यासाठी असल्याने या धरणातून या शहरांना पाणीपुरवठा करू नये, अशी जनहित याचिका पत्रकार नानासाहेब जवरे, विक्रांत रुपेंद्र काळे यांनी दाखल केली होती. शेतकऱ्यांच्या बाजूने मोफत खटला लढविणारे खंडपीठातील प्रसिद्ध वकील अजित काळे यांनी निळवंडे धरणाचे पाणी इतरत्र पळवून नेण्यात येऊ नये यासाठी हा खटला मोफत लढला. शिर्डीला पाण्याची आवश्यकता नसताना निळवंडे धरणातून पाणी उचलणे योग्य नाही, असा युक्तिवाद अजित काळे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने केला आणि या पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी देताना सरकारने घातलेल्या अटीची पूर्तता केल्याशिवाय या योजनेचे काम सुरू केले जाणार नाही या सरकारतर्फे ७ जून २०१८ रोजी दाखल झालेले पत्राची दखल घेत खंडपीठाने शिर्डी-कोपरगावच्या पाणी योजनेस स्थगिती दिली. या स्थगिती आदेशामुळे.दुष्काळ ग्रस्त परिसरातील शेतकऱ्यांनी जल्लोष केला.