निलंबन मागे न घेतल्यास
एसटीचा पुन्हा संपाचा इशारा
म. टा. वृत्तसेवा, शेवगाव
शेवगाव आगार प्रमुखाने लहरीपणाने व सुडबुद्धीने पाच एसटी कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई बेकायदार व निषेधार्ह आहे. सरकार व परिवहन महामंडळाने ही कारवाई त्वरीत मागे घ्यावी, अन्यथा नाइलास्तव राज्यातील हजारो एसटी कर्मचारी येत्या आषाढी एकादशीला स्वयंस्फुर्तीने संपाचे हत्यार उपसून पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी पंढरपूरला जातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी इंटक संघटनेचे राज्य सेक्रेटरी मुकेश तिगोटे यांनी दिला आहे. शेवगाव आगारात रविवारी आयोजित एसटी कामगारांच्या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी इंटकचे विभागीय सचिव सुरेश चौधरी, माया डोळस, शेवगाव इंटकचे तालुका सचिव दिलीप लबडे, राजेंद्र वडते, लक्ष्मण लव्हाट, इस्माइल पठाण, एस. एम. शेख, बाळासाहेब दहिफळे, बाळासाहेब जाधव, एस. जी. शेख, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.
तिगोटे म्हणाले, आपल्या न्याय हक्कांसाठी लोकशाही मार्गाने एसटी कर्मचारी संघटना आंदोलन करीत आहेत. गतवर्षी दिवाळीत १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान संप केल्यावर न्यायालयाने हस्तक्षेप केला होता. त्या वेळी वेतन कराराचा प्रश्नी तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. पंरतु, दिरंगाई होत असल्याने कामगारांत मोठा असंतोष निर्माण झाला. रावते यांनी एकतर्फी वेतनवाढीची घोषणा एक जून रोजी करून ४ हजार ८४९ कोटी रूपयांचा वेतन करार जाहीर करून ५ जूनला परिपत्रक काढले. त्यात आकडेवारी फुगवून सांगितली. हा फसवा वेतन करार कामगारांनी नाकारल्याने ८ व ९ जून रोजी कामगारांनी अघोषित संप पुकारला. या संपात एकाही एसटी बसचे नुकसान झाले नाही. मात्र, धांदात खोटे आरोप लावून कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुमारे १२०० कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली. गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे त्वरीत मागे घेण्याचे आश्वासन रावते यांनी दिले. काल पर्यंत १ हजार कर्मचा-यांचे निलंबन मागे घेण्यात आले. अद्याप २०० कर्मचारी निलंबित आहेत. या सर्व कर्मचा-यांवरील बेकायदेशीर कारवाई मागे घ्यावेत, वेतन करारात संघटनेच्या मागणीनुसार त्रुटी दूर कराव्यात या मागण्यांसाठी संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही साकडे घातले आहे. रावते यांनी सन्मानजनक तोडगा काढला नाही तर पुन्हा संप अटळ असेल, असा इशारा तिगोटे यांनी दिला. या वेळी आयटक कामगार संघटनेचे कॉ. संजय नांगरे, टायगर फोर्सचे किसन चव्हाण, गोरक्षनाथ शेलार यांनी एसटी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. संघटनेचे तालुका सचिव दिलीप लबडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
चौकट - १ ) देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एसटी कर्मचा-यांना अतिशय तुटपुंजे वेतन मिळते. त्यामुळे लोकशाही मार्गाने एस. टी. कामगार आंदोलन करीत आहेत. येथील पाच एसटी कर्मचा-यांवरील निलंबन मागे घेण्यासाठी शेवगावच्या विविध सामाजिक संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्याबद्दल मुकेश तिगोटे यांनी त्यांचे आभार मानले.
२) एसटी महामंडळाला मागील सरकारच्या काळात ३२४ कोटी रूपये तोटा होता. मात्र, गेल्या तीन साडेतीन वर्षात नको त्या गोष्टींवर वारेमाप खर्चामुळे हा तोटा ३१०० कोटी रूपयांवर गेला आहे. गेल्या तीन वर्षात एकही लाल एसटी बसची खरेदी करण्यात आलेली नाही. या उलट शिवशाही बस सुरू करून त्यावर खाजगी चालक ठेवून परिवहन महामंडळाची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप इंटकचे राज्य सेक्रेटरी मुकेश तिगोटे यांनी केला.