२७ हजार नागरिकांची तपासणी
म. टा. प्रतिनिधी, नगर
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जिल्ह्यात तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आरोग्य विभागाने मे ते जून २०१९ दरम्यान जिल्ह्यात मुख कर्करोग तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत जवळपास २७ हजार ६६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ९६ संशयित रूग्ण आढळून आले. या रुग्णांना तोंडात लाल चट्टे, पांढरे चट्टे दिसून आले तर काही जणांना तोंड उघडताही येत नव्हते.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांअतर्गत राबविण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील ३० वर्षांपुढील वय असणाऱ्या २७ हजार ६६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ९५ संशयित रुग्ण आढळून आले. यामध्ये प्रामुख्याने तोंडात लाल आणि पांढरे चट्टे असणे, तोंड उघडता न येणे अशी लक्षणे दिसून आली. यामध्ये तोंड उघडता न येणारे १४, तोंडात लाल चट्टा असणारे ३२ आणि पांढरा चट्टा असणारे ४९ रुग्ण होते. कॅन्सर तपासणीबरोबरच या मोहिमेत कॅन्सरबाबत जनजागृती करण्यात आली. कॅन्सरच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. गावोगावी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली.
मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष
आरोग्य विभागाच्या या तपासणीत अनेक नागरिकांचे मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या मोहिमेत मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जवळपास २ हजार ९५१ नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या नागरिकांचे मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली. याव्यतिरिक्त या मोहिमेत तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयांद्वारेही याबाबत जनजागृती केली जात आहे. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना कॅन्सरबाबत माहिती दिली जाते. तसेच त्यांचे प्रबोधन करण्यात येऊन व्यसनांच्या दुष्परिणामांबाबतही माहिती दिली जात आहे.
कॅन्सरचा धोका वाढतोय
बदलत्या जीवनशैलीमुळे आपले दैनंदिन आयुष्य सुखकर केले असले, तरी शरिराची होणारी ससेहोलपट आपल्या लक्षात येत नाही. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळे कर्करोगाच्या विळख्यात अडकले जात आहोत. गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांमध्ये विशेषतः मध्यमवर्गीयांमध्ये खाण्याच्या वाईट सवयी, जंक फूडचे सेवन, वाढता लठ्ठपणा, धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह आणि हृदयविकाराच्या संख्येत वाढ झाल्यामुळेही कर्करोग होण्याची शक्यता वाढली आहे.