अ‍ॅपशहर

Kanhuraj Bagate: ठाकरे सरकार प्रसन्न!; शिर्डी संस्थानच्या 'सीईओ'पदी पुन्हा 'हा' अधिकारी

Kanhuraj Bagate: शिर्डी संस्थानमध्ये कार्यरत असताना अनेक निर्णयांचा धडाका लावणारे कान्हुराज बगाटे यांच्यावर ठाकरे सरकार प्रसन्न झाले आहे. बगाटे यांची मुंबईत झालेली बदली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Authored byविजयसिंह होलम | Edited byगजानन सावंत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Dec 2020, 9:49 am
नगर: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कान्हुराज बगाटे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची मुंबई येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून झालेली बदली रद्द करण्यात आली आहे. ( Shri Saibaba Sansthan Trust Latest News Update )
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शिर्डी संस्थानच्या सीईओपदी पुन्हा कान्हुराज बगाटे


वाचा: शिर्डी साई मंदिरात ड्रेसकोड हवा की नको?; भक्तांनी दिला 'हा' कौल

बदली झाल्यानंतरही बगाटे शिर्डीतच कार्यरत होते. त्यांच्याच पुढाकारातून शिर्डीत भाविकांसाठी भारतीय पद्धतीच्या पोषाखासंबंधीचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. बगाटे यांची सुरुवातीला शिर्डी संस्थान येथे बदली झाली, तेव्हा ते आयएएस नव्हते. त्यावरून वाद उपस्थित झाला होता. त्यानंतर ते आयएएस झाले. त्यामुळे मधल्या काळात करण्यात आलेली त्यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा शिर्डीला नियुक्ती देण्यात आली आहे. राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश सरकारने काढला आहे. त्यामध्ये बगाटे यांचा समावेश आहे. आयएएस नसताना नियुक्ती झाल्याचा वाद उपस्थित झाल्यावर सरकारने त्यांची बदली मुंबईला केली होती. मात्र, त्यांच्या जागी शिर्डीला कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. आता पुन्हा त्यांची या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली असून भारतीय प्रशासन सेवेत बढती मिळाल्यानंतर रिक्त पदावर नियुक्ती देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वाचा: ठाकरे सरकार भ्रष्टाचारी, लवकरच पुरावे देणार!; राणेंनी केला 'हा' गंभीर आरोप

अनलॉक नंतर मंदिर खुले होताच येथील दर्शन व्यवस्थेचे नियोजन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ऑनलाइन बुकिंगद्वारे दर्शनाला येण्याची व्यवस्था भाविकांच्या सोयीची ठरत आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर मंदिरात योग्य त्या उपाययोजना त्यांनी आखून दिल्या आहेत. अलीकडेच त्यांच्या पुढाकारातून भाविकांना मंदिरात येताना भारतीय पोषाख करण्यासंबंधीच्या सूचना लावण्यात आल्या. यावरून काही संघटनांनी वाद उपस्थित केला असला तरी स्थानिक नागरिक, नेते, भाविक आणि सरकारही बगाटे यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे दिसून येते. या वादाच्या पार्श्वभूमीवर बगाटे यांची शिर्डीतील फेरनियुक्ती लक्षणीय ठरत आहे. शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाची मुदत पूर्वीच संपली असल्याने सध्या न्यायाधीश आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेले तदर्थ विश्वस्त मंडळ काम पहात आहे, यामध्येही बगाटे यांची भूमिका महत्त्वाची आहे.

वाचा: शिर्डी संस्थानची तुलना तालिबानशी!; तृप्ती देसाई यांनी पुन्हा दिला इशारा
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज