म. टा. वृत्तसेवा, कर्जत दुष्काळाने होरपळणाऱ्या तालुक्यात रोजगार हमीच्या ५८ कामांवर ४ हजार ३७७ मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. मार्चअखेर कुशल व अकुशल कामांपोटी तालुक्यात दोन कोटी ६१ लाख ५४ हजार ८१७ रुपयांची मजुरी अदा झाली आहे. तर एक लाख ४२ हजार २६१ लोकसंख्येला ८८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पंचायत समितीकडे मागेल त्याला काम देण्याची जय्यत तयारी आहे. यासाठी या कार्यालयाकडे ४ हजार २०० कामे मंजूर आहेत. परंतु, हे सर्व नियोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले त्या गटविकास अधिकारी कल्पना सावंत व विस्तार अधिकारी देविदास काकडे हे दोन अनुभवी व कुशल अधिकारी येत्या ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. तालुक्यात २८ रस्त्यांच्या कामांवर सर्वाधिक २ हजार ६६५ तर गाळ काढण्याच्या कामांवर १ हजार ५४५ मजूर आहेत. निंबोडी, शितपूर, निमगावडाकू, तिखी, चिंचोली काळदात, रवळगाव, टाकळी खंडेश्वरी, परीटवाडी येथील जलस्रोतांमधील गाळ काढणे सुरू आहे. विहीर पुनर्भरणाची १७ कामे, मांदळी आणि खेड येथे रस्त्यालगत वृक्षलागवड व माळंगी येथे दोन घरकुलांची कामे सुरू आहेत. ३९१ शोषखड्ड्यांची कामे झाली आहेत. ३४ विहिरींना प्रशासकीय मंजुरी आहे. यात डिकसळ (८ विहिरी), बिटकेवाडी व भोसे (प्रत्येकी ७), कौडाणे (४), रेहकुरी (दोन), चांदे खुर्द (३), कापरेवाडी (२) व नागमठाण (१) या आठ गावांचा समावेश आहे. मार्चअखेर यातील अकुशल कामांपोटी एक कोटी ८२ लाख ५८ हजार ७२५ रुपये व कुशल कामांपोटी ७८ लाख ९६ हजार ९२ रुपये अदा झाले आहेत. ७८ गावे व ३८७ वाड्यावस्त्यांची एक लाख ४२ हजार २६१ लोकसंख्या ८८ टँकरच्या १९२ खेपांवर अवलंबून आहे. या गावांसाठी पाटेवाडी, दूरगाव, मांदळी, देशमुखवाडी व राशीन येथील स्रोतांमधून टँकरला पाणी उपलब्ध होत आहे. |
कर्जत पंचायत समितीचे दुष्काळाशी दोन हात
दुष्काळाने होरपळणाऱ्या तालुक्यात रोजगार हमीच्या ५८ कामांवर ४ हजार ३७७ मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. मार्चअखेर कुशल व अकुशल कामांपोटी तालुक्यात दोन कोटी ६१ लाख ५४ हजार ८१७ रुपयांची मजुरी अदा झाली आहे.
Maharashtra Times 26 May 2016, 3:00 am