म. टा. प्रतिनिधी, नगर
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नगर जिल्हा सहकारी बँकेने तब्बल ४ लाख फॉर्म (अर्ज) छापून घेतले असून, त्यांचे वितरण गावपातळीवर कर्जदार शेतकऱ्यांपर्यंत केले जात आहे. या अर्जातील माहिती लेखी भरून तसेच त्यासमवेत आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर या अर्जांच्या आधारे शेतकऱ्यांना ऑनलाइन माहिती भरणे सोपे होणार आहे. अर्थात आता ऑनलाइन अर्ज भरण्याची अट सरकारने काढून टाकली असल्याने या भरलेल्या लेखी अर्जांच्या आधारेच जिल्हा बँकेला शेतकरी कर्जमाफीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना सहजगत्या देणे शक्य होणार आहे. अशा पद्धतीने लेखी अर्ज छापून त्याद्वारे शेतकरी कर्जमाफीसाठी पुढाकार घेणारी जळगाव जिल्हा बँकेनंतर नगर जिल्हा बँक दुसरी ठरली आहे.
शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांनी भरून द्यावयाच्या दोन पानी घोषणापत्राचा नमुना राज्यातील सर्व जिल्हा बँकांना कळवला आहे. यासमवेत ऑनलाइन पद्धतीने कर्जमाफीचा अर्ज कसा भरायचा, याचे सविस्तर विवरण असलेले १५ पानी सूचनापत्रक आहे. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाइन माहिती भरण्याबाबत अडचणी येण्याची शक्यता असल्याने त्यांना सोयीचे जावे म्हणून नगर जिल्हा सहकारी बँकेने हा दोन पानी फॉर्मच छापून घेतला आहे. पहिल्या टप्प्यात असे चार लाख फॉर्म छापले गेले असून, त्यांचे वितरण बँकेच्या जिल्हाभरातील २८६ शाखा तसेच तालुका विकास कार्यालयांद्वारे गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा संस्थेपर्यंत सुरू झाले आहे. या संस्थांद्वारे हे अर्ज प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिले जाणार असून, त्यावर त्यांच्या कर्ज थकबाकीची माहितीही त्यांच्याकडून भरून घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारे तसेच कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला आधार क्रमांक, पॅन क्रमांक, पेन्शन पीपीओ क्रमांक, कर्जखाते पुस्तिका, बँकेचे पासबुक यांच्या मूळ व झेरॉक्स प्रती समवेत घेऊन सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, सेतू कार्यालय वा ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम कार्यालयातून ऑनलाइन माहिती भरण्याचे मार्गदर्शनही त्यांना केले जाणार आहे.
रेकॉर्ड तयार होणार
कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरण्यात ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी येतात. त्यामुळे ऑनलाइन माहिती भरताना तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळेच बँकेने लेखी अर्जाद्वारे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यास प्राधान्य दिले आहे. यातून कर्जमाफी अर्जांचे रेकॉर्डही बँकेचे तयार होणार आहे.
आकडे अजून अस्पष्ट
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीची व्याप्ती १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अशी तब्बल ७ वर्षांतील थकबाकीची असल्याने नेमक्या किती थकबाकीदारांना किती कोटींची माफी मिळणार, याची आकडेवारी अजूनही निश्चित होत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने लिखित अर्जाद्वारे माहिती संकलन करताना विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या गटसचिवांना, कोणता थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीच्या कोणत्या निकषात बसतो, हे तपासून त्यानुसार माहिती भरण्याच्याही सूचना केल्या असल्याने यातून कर्जमाफीतील शेतकरी व त्यांच्या माफी रकमेचे आकडे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
चौकट ः
पावणे दोन कोटींचे वाटप
कर्जमाफीपोटी शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांसाठी जिल्हा बँकेने १० हजारांचे वितरण सुरू केले आहे. आतापर्यंत १ हजार ८१७ शेतकऱ्यांना १ कोटी ७८ लाख ८३ हजारांचे वाटप झाले आहे. १० हजार रुपयांची मागणी करणारे १० हजार १८५ अर्ज बँकेने मंजूर केले असून, त्यासाठी ९ कोटी ८६ लाख ८५ हजारांची तरतूदही केली आहे. राज्यात नगर जिल्हा बँकेचेच असे रक्कम वाटप आघाडीवर आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नगर जिल्हा सहकारी बँकेने तब्बल ४ लाख फॉर्म (अर्ज) छापून घेतले असून, त्यांचे वितरण गावपातळीवर कर्जदार शेतकऱ्यांपर्यंत केले जात आहे. या अर्जातील माहिती लेखी भरून तसेच त्यासमवेत आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर या अर्जांच्या आधारे शेतकऱ्यांना ऑनलाइन माहिती भरणे सोपे होणार आहे. अर्थात आता ऑनलाइन अर्ज भरण्याची अट सरकारने काढून टाकली असल्याने या भरलेल्या लेखी अर्जांच्या आधारेच जिल्हा बँकेला शेतकरी कर्जमाफीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना सहजगत्या देणे शक्य होणार आहे. अशा पद्धतीने लेखी अर्ज छापून त्याद्वारे शेतकरी कर्जमाफीसाठी पुढाकार घेणारी जळगाव जिल्हा बँकेनंतर नगर जिल्हा बँक दुसरी ठरली आहे.
शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांनी भरून द्यावयाच्या दोन पानी घोषणापत्राचा नमुना राज्यातील सर्व जिल्हा बँकांना कळवला आहे. यासमवेत ऑनलाइन पद्धतीने कर्जमाफीचा अर्ज कसा भरायचा, याचे सविस्तर विवरण असलेले १५ पानी सूचनापत्रक आहे. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाइन माहिती भरण्याबाबत अडचणी येण्याची शक्यता असल्याने त्यांना सोयीचे जावे म्हणून नगर जिल्हा सहकारी बँकेने हा दोन पानी फॉर्मच छापून घेतला आहे. पहिल्या टप्प्यात असे चार लाख फॉर्म छापले गेले असून, त्यांचे वितरण बँकेच्या जिल्हाभरातील २८६ शाखा तसेच तालुका विकास कार्यालयांद्वारे गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा संस्थेपर्यंत सुरू झाले आहे. या संस्थांद्वारे हे अर्ज प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिले जाणार असून, त्यावर त्यांच्या कर्ज थकबाकीची माहितीही त्यांच्याकडून भरून घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारे तसेच कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला आधार क्रमांक, पॅन क्रमांक, पेन्शन पीपीओ क्रमांक, कर्जखाते पुस्तिका, बँकेचे पासबुक यांच्या मूळ व झेरॉक्स प्रती समवेत घेऊन सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, सेतू कार्यालय वा ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम कार्यालयातून ऑनलाइन माहिती भरण्याचे मार्गदर्शनही त्यांना केले जाणार आहे.
रेकॉर्ड तयार होणार
कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरण्यात ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी येतात. त्यामुळे ऑनलाइन माहिती भरताना तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळेच बँकेने लेखी अर्जाद्वारे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यास प्राधान्य दिले आहे. यातून कर्जमाफी अर्जांचे रेकॉर्डही बँकेचे तयार होणार आहे.
आकडे अजून अस्पष्ट
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीची व्याप्ती १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अशी तब्बल ७ वर्षांतील थकबाकीची असल्याने नेमक्या किती थकबाकीदारांना किती कोटींची माफी मिळणार, याची आकडेवारी अजूनही निश्चित होत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने लिखित अर्जाद्वारे माहिती संकलन करताना विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या गटसचिवांना, कोणता थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीच्या कोणत्या निकषात बसतो, हे तपासून त्यानुसार माहिती भरण्याच्याही सूचना केल्या असल्याने यातून कर्जमाफीतील शेतकरी व त्यांच्या माफी रकमेचे आकडे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
चौकट ः
पावणे दोन कोटींचे वाटप
कर्जमाफीपोटी शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांसाठी जिल्हा बँकेने १० हजारांचे वितरण सुरू केले आहे. आतापर्यंत १ हजार ८१७ शेतकऱ्यांना १ कोटी ७८ लाख ८३ हजारांचे वाटप झाले आहे. १० हजार रुपयांची मागणी करणारे १० हजार १८५ अर्ज बँकेने मंजूर केले असून, त्यासाठी ९ कोटी ८६ लाख ८५ हजारांची तरतूदही केली आहे. राज्यात नगर जिल्हा बँकेचेच असे रक्कम वाटप आघाडीवर आहे.