संगमनेर : 'पुण्यातील एल्गार परिषदेची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याचा केंद्राचा निर्णय काळजी वाढवणारा आहे. दलित व आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव तर नाही ना,' अशी भीती महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. थोरात मंगळवारी (१८ फेब्रुवारी) संगमनेर येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे पुण्यातील एल्गार परिषदेच्या चौकशीच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची साथ मिळाली आहे. आता काँग्रेसकडून थोरात यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. 'एल्गार परिषदेचे व्यासपीठ पुरोगामी लोकांचे होते. तेथे कुणी वेगळे वागले असेल. त्याबद्दलचा काही पुरावा असेल तर आम्ही त्यांची बाजू घेणार नाही; मात्र, जे कवी, विचारवंत होते, त्यांनी काही पुरोगामी विचार मांडले. त्यांची चौकशी करणे चुकीचे आहे,' असे थोरात म्हणाले. 'महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. 'एल्गार'च्या निमित्ताने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ संपवण्याचा डाव आहे का, संपूर्ण आंबेडकरी, दलित चळवळीलाच नक्षलवादी ठरवण्याचा डाव आहे का, अशी चिंता वाटते,' असेही त्यांनी सांगितले.
'आंबेडकरी चळवळीला नक्षली ठरवण्याचा डाव'
'पुण्यातील एल्गार परिषदेची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याचा केंद्राचा निर्णय काळजी वाढवणारा आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2020, 4:00 am