वन विभागाने पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी;
म. टा. वृत्तसेवा, पाथर्डी
तालुक्यातील मोहरी गावातील डोईफोडी वस्तीलगत असलेल्या गोसावी वस्तीजवळील चिरदऱ्यात बिबट्याच्या वावराने घबराट पसरली आहे. बिबट्या जनावरांवर हल्ल्याच्या तयारीत असताना ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना साधव राहण्याचा सल्ला दिला आहे. पिंजरा लावण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता चिरदरा परिसरात अर्जुन बन व गोरक्ष बन जनावरे चारण्यासाठी गेले होते. बिबट्याने जनावरांचा पाठलाग सुरू केला. जनावरे बनवस्तीकडे पळाली. बन बंधूंनी भ्रमणदूरध्वनीवरून वस्तीवर त्यांच्या मित्रांना बिबट्या आल्याचे कळविले त्यानंतर नागरिक धावले. चिरदऱ्यात बिबट्या दबा धरून बसला होता. काही वेळानंतर ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. दोन महिन्यांपूर्वी बिबट्याने केलेल्या हल्यात संजय बन, गोरक्ष बन यांची एक गाय आणि चार शेळ्या ठार झाल्या होत्या. या भागात सातत्याने बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. अमोल डोईफोडे, हर्षल डोईफोडे, अशोक डोईफोडे, उमेश डोईफोडे, साहेबराव डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, प्रभाकर डोईफोडे, सुनील बन, गोरक्ष बन, संजय बन, अर्जुन बन, भाऊसाहेब बन आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. वनसेवक अशोक मरकड, बाळू मरकड यांनी गोसावी वस्तीला भेट दिली. 'बिबट्या पाण्याच्या शोधात लोक वस्तीकडे येत आहे. नागरिकांनी सावध रहावे. डोंगराळ भाग असल्याने दरवर्षी बिबट्याचा या भागात वावर असतो,' असे वनसेवक अशोक मरकड यांनी सांगितले. 'ग्रामपंचायतीने लेखी पत्र दिल्यानंतर येथे लवकरच पिंजरा लावला जाईल. खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी एकटे या भागात फिरू नये. खबरदारी घेऊन काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. बिबट्याचा वावर असल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे,' असे मरकड यांनी सांगितले.