अ‍ॅपशहर

महासभेत प्रशासन धारेवर

नगर महापालिकेच्या नागरी सुविधांच्या दैन्यावस्थेबाबत महासभेत मंगळवारी (१४ जून) सत्ताधारी राष्ट्रवादी व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांची रडारड कायम राहिली.

Maharashtra Times 15 Jun 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahasabha
महासभेत प्रशासन धारेवर


नगर महापालिकेच्या नागरी सुविधांच्या दैन्यावस्थेबाबत महासभेत मंगळवारी (१४ जून) सत्ताधारी राष्ट्रवादी व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांची रडारड कायम राहिली. सत्तेत असूनही वॉर्डांतील नागरी सुविधा मार्गी लागत नसल्याची खंत व्यक्त केली गेली. पुरेसे स्वच्छता कर्मचारी नाहीत, पाणीपुरवठा पुरेसा होत नाही, नव्या पाणी योजनेची कामे रखडली आहेत, कचऱ्यांचे ढीग वॉर्डात साठले आहेत, अशा अनेक समस्या उपस्थित करून सत्ताधाऱ्यांनीच आज प्रशासनाला धारेवर धरले. नागरी सुविधा दिल्या गेल्या नाही तर आंदोलनाचे इशारेही दिले गेले.
नगर महापालिकेच्या नव्या महापौरांची निवड येत्या २१ रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यमान राष्ट्रवादीचे महापौर अभिषेक कळमकर यांच्या कारकिर्दीतील अखेरची महासभा मंगळवारी झाली. महापौर निवडीमुळे शिवसेना-भाजपचे बहुतांश नगरसेवक सहलीवर असल्याने महासभेस बहुतांश सत्ताधारीच राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक जास्त संख्येने होते. या मंडळींनीच नागरी सुविधांची दैन्यावस्था प्राधान्याने मांडण्यास व त्याद्वारे प्रशासनास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर, नवे आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरी सुविधांबाबत आश्वासने दिल्यानंतर हा गदारोळ तासाभराने शांत झाला.

कर्मचाऱ्यांची अवांतर कामे
मनपा सत्तेतील राष्ट्रवादीचे सभागृह नेते कुमार वाकळे यांनी त्यांच्या वॉर्डातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येचा विषय उपस्थित करून चर्चेला तोंड फोडले. अन्य विभागांतील १६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असताना त्यातील केवळ दोन जण हजर झाल्याने पुन्हा प्रस्ताव पाठविल्याचे उत्तर प्रशासनाकडून आले. आमदार संग्राम जगताप, स्वप्निल शिंदे, संपत बारस्कर, कैलास गिरवले, सुनील कोतकर, गणेश भोसले, नसीम शेख, दीप चव्हाण, नीता घुले, संजय घुले, विजय गव्हाळे, किशोर डागवाले, अनिल शिंदे आदींनी रस्ते दुरवस्था, कचरा समस्या, विस्कळित पाणीपुरवठा, उशिरा सुरू झालेली नालेसफाईसह अन्य विविध मुद्दे उपस्थित केले. ‘फक्त सह्या करून पगार घेणारे २५ ते ३० टक्के कर्मचारी’, ‘मनपात ठेकेदारी करणारे कर्मचारी’, ‘मनपाचा पगार घेऊन दुसरीकडे घरगडी म्हणून काम करणारे कर्मचारी’, असे अनेक विषय जोरदार मांडले गेले. यावर, प्रशासनाकडून आरोग्य विभागप्रमुख डॉ. पैठणकर, उपसहायक उपायुक्त अशोक साबळे, उपायुक्त अजय चारठाणकर आदींनी चौकशी व कार्यवाहीची आश्वासने दिली. पण गदारोळ थांबत नसल्याने अखेर आयुक्त गावडे यांनी कचरा व सफाई कर्मचाऱ्यांच्या संख्येचा फेरआढावा घेऊन त्यांना सर्व वॉर्डांमध्ये समान संख्येत काम वाटप करण्याचे जाहीर केले. याशिवाय कचरा वाहनांची दुरुस्ती मार्गी लावण्यासह नव्याने कॉम्पॅक्टर व कचरा कुंड्या खरेदीचा मनोदयही व्यक्त केला. कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीबद्दल कठोर कारवाईचे सूतोवाचही केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज