अ‍ॅपशहर

महासभेचे भवितव्य ठरणार

महापालिकेच्या स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीवर सदस्य नियुक्तीसाठी येत्या बुधवारी (२१ जून) आयोजित महासभेचे भवितव्य मंगळवारी (२० जून) औरंगाबाद खंडपीठात दाखल स्थगिती अर्जाच्या निकालावर ठरणार आहे.

Maharashtra Times 20 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahasabha today
महासभेचे भवितव्य ठरणार


महापालिकेच्या स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीवर सदस्य नियुक्तीसाठी येत्या बुधवारी (२१ जून) आयोजित महासभेचे भवितव्य मंगळवारी (२० जून) औरंगाबाद खंडपीठात दाखल स्थगिती अर्जाच्या निकालावर ठरणार आहे. दरम्यान, बुधवारची महासभा होणार हे गृहित धरून मनपातील राजकीय घडामोडीही वेगवान झाल्या आहेत. या दोन्ही समित्यांवर कोणाची वर्णी लावायची, याची रस्सीखेच रंगात आल्याचे चित्र आहे.

स्थायी समितीच्या ८ तसेच महिला व बालकल्याण समितीच्या १६ मिळून एकूण २४ जागांवर नगरसेवकांमधून नियुक्ती जाहीर करण्यासाठी बुधवारी महासभा आयोजित केली आहे. मात्र, मनपामध्ये शिवसेना वगळता अन्य भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसे या चारही पक्षांचा गटनेतेपदाचा वाद आहे. याबाबत खंडपीठात याचिकाही दाखल आहे. मागीलवेळी १५ एप्रिलला याच विषयावर झालेली महासभा केवळ गटनेतेपदाबाबत संभ्रम असल्याने गुंडाळली गेली होती. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा याच विषयावर महासभा होणार असल्याने गटनेतेपदाचा संभ्रम मिटेपर्यंत या सभेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज नगरसेवक संपत बारस्कर यांनी सोमवारी खंडपीठात दाखल केला आहे. न्यायालयाने त्यावर मंगळवारी (२० जून) सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीनंतरच महासभेला परवानगी मिळते की ती स्थगित होते, हे निश्चित होणार असल्याने बुधवारच्या महासभेचे भवितव्य या सुनावणीच्या निकालावर अवलंबून आहे. मंगळवारी खंडपीठात ही सुनावणी होणार असल्याने मनपा प्रशासनाने महासभेतील सदस्य नेमणुकीसंदर्भातील कामकाज, गटनेता पत्रव्यवहार वा बैठक करू नये, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आरिफ शेख यांनी मनपा आयुक्तांना सोमवारी दिले आहे.

राजकीय घडामोडी सुरूच

स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समिती मिळून २४ सदस्यांमध्ये शिवसेनेचे ८, भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेसचे ४ व मनसेचे २ नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे नोंद असलेल्या पक्षीय गटनेत्यांच्या शिफारशी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. यानुसार शिवसेनेचे संजय शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समद खान, काँग्रेसचे संदीप कोतकर, भाजपचे दत्ता कावरे व मनसेचे गणेश भोसले या गटनेत्यांकडून सुचवलेली नावे महासभेत महापौर सुरेखा कदम यांच्याकडून जाहीर केली जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेतील सर्वच पक्षांमध्ये या नियुक्तीसाठी नगरसेवकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. गटनेत्यांकडून आपल्याच नावाची शिफारस व्हावी, म्हणून भेटीगाठी व फोनाफोनी सुरू आहे. त्यामुळे जर महासभा झालीच तर कोणते २४ जण नशिबवान ठरतात, याची उत्सुकता मनपाच्या वर्तुळात आहे.

युतीमध्ये खडाखडी

महापौरांनी भाजपचे जुने गटनेते दत्ता कावरे यांची नावे स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी भाजपमधील खासदार दिलीप गांधी समर्थक गटाच्या नगरसेवकांनी त्यांचे गटनेते सुवेंद्र गांधी यांनीच सुचवलेली नावे घेण्याचा आग्रह धरला आहे. तसे झाले नाही तर मनपात विरोधात बसण्याचे जाहीर केले आहे. शिवाय शिवसेनेने शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्या कोट्यातून भाजपचा एक सदस्य स्थायी समितीवर घ्यावा, अशीही त्यांची मागणी आहे. पण या मागण्यांना भीक न घालण्याचा पवित्रा शिवसेनेने घेतल्याचे समजते. सत्तेत सहभागी होताना भाजपने सहकार्याची भूमिका ठेवण्याचा शब्द दिला असताना ‘अमृत योजने’सह विकास कामांमध्ये चौकशीची पत्रे देऊन खोडा घातला गेल्याने ही कामे प्रलंबित राहिल्याचे सेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे सत्तेतील पक्षांमधील खडाखडी चर्चेची झाली आहे.

चौकट ः

सत्तेत राहून विरोध

राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सत्तेत असणारी शिवसेना जनतेच्या प्रश्नासाठी जशी सत्तेच्या विरोधात भूमिका घेते, तशा पद्धतीने नगरच्या मनपामध्ये भाजपनेही उपमहापौरांसह अन्य सत्तापदे ताब्यात ठेवूनच भविष्यात सत्ताधारी सेनेच्या कामकाजाविरोधात आवाज उठविण्याचे नियोजन केल्याचे सांगितले जाते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज