कर्जमाफीत चार हजारांवर तक्रारी; जिल्ह्याला मिळाली चौदाशे कोटींची रक्कम
म. टा. प्रतिनिधी, नगर
ज्येष्ठ नागरिकांच्या आधार क्रमांक प्रमाणीकरणात अनेकांचा अंगठ्याचा ठसा मॅच होत नाही, तर काहींचे आधार कार्डच म्हणजे त्यावरील क्रमांकच मॅच होत नाही. अशा सुमारे चार हजार तक्रारी जिल्ह्यात आहेत. यापैकी दीड हजारांवर तक्रारींचे निराकरण केले गेले असले, तरी अजून अडीच हजारांवर तक्रारींवर निर्णय प्रतीक्षेत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना १३९४ कोटींची कर्जमाफी मिळाली असून, या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात संबंधित रक्कम जमा झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारद्वारे राबवल्या जात असलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांना त्यांचा आधार क्रमांक लिंक केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा कर्जमाफी देण्याची वेळ येते, तेव्हा आधार प्रमाणीकरण केले जाते. या प्रमाणीकरणाच्या वेळीच काहींच्या हाताच्या अंगठ्यांचे ठसे आधार कार्डावर असलेल्या अंगठ्याच्या ठशांशी जुळत नाहीत. बहुतांश वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या वेळी अशा अडचणी आल्या आहेत. त्यामुळे यावर उपाय काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधितांचे प्रतिज्ञापत्र वा अन्य कागदपत्रे घेऊन कर्जमाफीचा लाभ देण्याचा विचार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काहींचे नवीन आधार कार्डही काढण्याचे प्रयत्न आहेत. याशिवाय काहींचा आधार क्रमांक जुळत नसल्याने कर्जखात्याला आधार लिंक करताना संगणक ऑपरेटरकडून चुकीचे आकडे भरले गेले काय वा अन्य काही तांत्रिक अडचण आहे काय, याचीही तपासणी केली जात आहे. अंगठ्याचा ठसा मॅच होत नसल्याच्या २००८ तक्रारी तहसीलदारांच्या स्तरावर आल्या होत्या. त्यापैकी १५१५ निकाली काढल्या गेल्या आहेत. अजून ७२६ तक्रारींवर निकाल प्रतीक्षेत आहे, तर आधार कार्ड क्रमांक मॅच होत नाही; तसेच कर्जखात्यात दाखवलेली रक्कम अमान्य असल्याच्या जिल्हास्तरीय समितीकडे आलेल्या १९१४ तक्रारींपैकी २३३ निकाली निघाल्या असून, अजून १६८१ तक्रारींवर निर्णय़ बाकी आहे. कर्ज रक्कम अमान्य असलेल्या तक्रारींबाबत संबंधित बँकांकडून तक्रारदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची, तसेच त्यावरील व्याज आकारणीची तपासणी करवून घेतली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
............
चौदाशे कोटी आले
महाविकास आघाडीच्या नव्या कर्जमाफी योजनेत जिल्हा बँकेला १४९८ कोटी व व्यापारी-खासगी-सार्वजनिक-ग्रामीण बँकांना सुमारे ८०० कोटी मिळणे अपेक्षित आहेत. जिल्हा बँकेचे दोन लाख १५ हजार व अन्य बँकांचे ४५ हजार असे दोन्ही मिळून दोन लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात टप्प्याटप्प्याने जमा होणार असल्याचे सांगितले जाते. सध्याच्या स्थितीत जिल्हा बँकेच्या दोन लाख ४ हजार २१७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात ११६७ कोटी रुपये व व्यापारी बँकांच्या २२ हजार १२१ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात २२७ कोटी रुपये जमा झाले आहेत. दोन्ही मिळून दोन लाख २६ हजार ३३८ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १३९४ कोटी रुपये सरकारकडून जमा झाले आहेत. आधार प्रमाणीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन लाख ४१ हजार ५८० शेतकऱ्यांचे असे प्रमाणीकरण झाले आहे. कर्जमाफीचे ९५ टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे.
............
कोट
कर्जमुक्ती योजनेबाबत तहसीलदार स्तरावर व जिल्हास्तरीय समिती स्तरावर प्रलंबित असलेल्या तक्रारी निकाली काढण्याला प्राधान्य दिले गेले आहे. येत्या काही दिवसांतच दाखल सर्व तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे.
-दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, नगर
..............