मटा : सोशल फेस्टिवल
............
नगरला सामाजिक कार्याचा प्रदीर्घ वारसा आहे. याचे बीजारोपण तरुण वयातच होते. त्यामुळेच येथील तरुणांचे समूह आपापल्या परीने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. केवळ गणेश मंडळेच नव्हे, तर कित्येक संघटना, ग्रुप राजकारणविरहित समाजसेवेचे काम करीत आहेत. अशाच काही ग्रुपचा या वर्षीच्या 'मटा सोशल फेस्टिव्हल'च्या माध्यमातून परिचय...
.........
कुटुंबासह घेतला जातो समाजसेवेचा 'आनंद'
म. टा. प्रतिनिधी, नगर
समाजकारणासह राजकारण, उद्योजकता, नोकरी वा व्यवसायात व्यग्र असणारे बहुतांश जण कुटुंबाला आपल्या क्षेत्रापासून थोडे लांब ठेवतात. काही चांगली-वाईट कारणे त्यामागे असतात. पण नगरच्या नवी पेठेतील जय आनंद महावीर युवक मंडळाने मात्र प्रत्येक समाजकार्य कुटुंबातील महिलांना समवेत घेऊनच करण्याचा पायंडा पाडला आहे. महिलांना समाजात वावरण्याचा अनुभव यावा व त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होण्याचा विचार यामागे आहे. या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचे आगळेवेगळे कार्यही होत आहे.
रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारे जय आनंद महावीर युवक मंडळ दर महिन्याला कमीतकमी दोन तरी सामाजिक उपक्रम करते. जानेवारी ते डिसेंबर असे समाजकार्याचे कॅलेंडरच केले गेले आहे. मंडळाने अन्नदानातून समाजतृप्तीला विशेष महत्त्व दिले आहे. आचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या स्मृतिदिनी २८ मार्चला ८ ते १० हजारांचे अन्नदान केले जाते. याशिवाय नवरात्रात मोहटा देवीला पायी जाणाऱ्या भाविकांना सफरचंद व शहाळे वाटप, आषाढीला खिचडी वाटप, गणेशोत्सवात लाडू वाटप, दिवाळीत अनाथ मुला-मुलींच्या संस्थेमध्ये कपडे-फराळ भेट अशा विविध उपक्रमांतून गरजूंपर्यंत अन्न पोचवण्याला महत्त्व दिले गेले आहे. ग्रामीण भागातील गरीब शाळकरी मुला-मुलींना शाळेत येण्या-जाण्यासाठी सायकली, अपंगांना तीनचाकी सायकली, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या चपलांची दुरुस्ती, दरवर्षी रक्तदान शिबिरात किमान २५० रक्तपिशव्यांचे संकलन अशी अनेकविध सामाजिक कामे उत्साहाने सुरू असतात.
नगर अर्बन बँकेचे संचालक शैलेश मुनोत यांच्या नेतृत्वाखालील कार्यरत असलेल्या या मंडळातील ३० सदस्य कुटुंबासह प्रत्येक उपक्रमात सक्रिय असतात. स्वतःची वर्गणी व दानशुरांची मदत यातून शैक्षणिक प्रोत्साहन व महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला जातो. महिलांचे पाककला कौशल्य अधिक विकसित होण्यासाठी शालेय मुलांचे टिफिन, पौष्टिक पराठे, मोदक अशा स्पर्धांतून प्रोत्साहन दिले जाते. मुलांमधील वैज्ञानिक चिकित्सा वृद्धींगत होण्यासाठी विज्ञान प्रयोग उपक्रम स्पर्धा शालेय गटात होते. यातील चांगल्या वैज्ञानिक प्रयोगांच्या अधिक विकासासाठी संबंधित मुला-मुलीला संशोधनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व आवश्यक मदतही केली जाते. मंडळाच्या या कामासह अन्य सामाजिक उपक्रमांना अशोकभाऊ फिरोदिया फाउंडेशन व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनसह मर्चंट बँकेचे स्वतःहून सहकार्य असते. मुनोत यांच्यासह सचिन कोठारी, शरद मुथा, अभय बोरा, प्रकाश गांधी, ललित बनबेरू, अमित गांधी, योगेश मुनोत, हेमंत मुथा, चेतन गुगळे, कुंतीलाल राका, राहुल सावदेकर, प्रमोद गांधी, सत्येन मुथा, भारती गुंदेचा, वृषाली राका, मयुरी सावदेकर, स्नेहल कोठारी, भाग्यश्री गांधी, राखी मुनोत, सोना डागा यासह अन्य सदस्य यात सक्रिय आहेत.
जय आनंद महावीर युवक मंडळाचे बहुतांश सर्वच सदस्य उद्योग-व्यवसायात आहेत. यापैकी अनेकांच्या शहरातील विविध बँका व पतसंस्थांतून ठेवी आहेत. दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान या ठेवींवर लाभांश मिळतो. सर्व सदस्यांचा असा लाभांश जमा करून दिवाळीच्या काळात कुटुंबासह अनाथ मुलांसमवेत दिवाळीचा आनंद लुटला जातो. शहरात अनेक मंडळे आहेत, त्यांचेही छोटे-मोठे समाजकार्य नेहमीच सुरू असते. पण मैत्रीचे धागे कुटुंबालाही जोडून घेत वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे उपक्रम ही 'जय आनंद'ची वेगळी ओळख ठरू लागले आहे.
..............
बचत गटाचे ध्येय
पापड मेकिंग, खाकरा मेकिंग, शिलाई मशीन वा अन्य स्वयंरोजगार साधने देताना त्यांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोचवून महिला व गरजूंसाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी बचत गट स्थापन करून तेथे स्वखर्चाने सर्व यंत्रणा करवून देण्याचेही नियोजन आहे.
.............