नगर : दूध दरप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावात शुक्रवारी (१८ मे) राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे देण्यात आली.
याबाबत माहिती देताना समितीने म्हटले आहे, दुधाचे दर मागील सात आठ महिन्यांपासून कोसळल्याने राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याविरोधात आंदोलनाची पहिली ठिणगी वैजापूर तालुक्यातील लाखगंगा गावात पडली. गावाने मोफत दूध वाटपाचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यभर ३ ते ९ मे या कालावधीत हे आंदोलन झाले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेनेही मंत्रालयात गुरे घुसविण्याचा पवित्र घेतला. सरकारला अखेर या सर्व आंदोलनांची दखल घेत दूधप्रश्नी हस्तक्षेप करावा लागला. प्रश्न सोडविण्यासाठी दूध बनविणाऱ्या दूध संघ व कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला; मात्र, सरकारने केलेला हा उपाय तुटपुंजा असून त्यामुळे दुधाच्या दरावर काडीचाही फरक पडलेला नाही. त्यामुळे हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
दूध प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ज्या लाखगंगा गावाने पहिला ठराव केला त्याच गावात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी (१८ मे) सकाळी ११ वाजता ग्रामसभा आणि राज्यातील दूध उत्पादकांची बैठक होणार आहे. आमदार कडू, महाराष्ट्र किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले या वेळी उपस्थित राहणार आहेत, असे संयोजक धनंजय धोरडे, दिगंबर तुरकणे यांनी सांगितले.