म. टा. वृत्तसेवा, राहुरी
मुळा नदीकाठावरील देसवंडी येथे मुळा व देवनदी या दोन्ही नद्यांच्या संगमावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पुढाकार घेत प्रलंबित राहिलेला प्रश्न हाती घेतला. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत पुण्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत बंधाऱ्याबाबत चर्चा झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून देसवंडी येथे बंधारा बांधावा, अशी मागणी होत होती. प्रसाद तनपुरे यांनी मागणी उचलून धरत बंधारा उभारणीबाबत चाचपणी केली होती. दरम्यानच्या काळात त्याला राजकीय वळण लागत गेले व त्यातूनच विरोध केला गेला. नंतरच्या काळात राज्यात सत्ताबदल घडला व भाजपचे सरकार आले. मात्र, तत्कालीन लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने प्रसाद तनपुरे यांनी बंधारा उभारणीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाही करण्याच्या सूचना केल्याचे कळते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये तनपुरे यांचा शब्द महत्त्वाचा मानला जात असल्याने त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी नव्याने मागणी करण्यात आली होती. त्यानुसार तनपुरे यांनी जयंत पाटील यांना बंधारा बांधण्यासाठी शब्द टाकला. पाटील यांनीही लक्ष घालून प्रयत्न सुरू केले आहेत. या घडामोडींमुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
.............