नगर : राज्यातील पशुधनास आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ८० तालुक्यांत फिरती पशुचिकित्सालये सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर पुढील कार्यवाही झालेली नाही. विधानसभा निवडणुकीमुळे कार्यवाही रखडली होती; परंतु, निवडणुकीनंतरही अद्याप दवाखाने सुरू झालेले नाहीत. राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने हा निर्णय कागदावरच राहिला आहे.
या निर्णयानुसार नगर जिल्ह्यातील नेवासे, कर्जत आणि श्रीगोंदे या तीन तालुक्यांत चिकित्सा पथकांना मंजुरी देण्यात आली आहे. या दवाखान्यांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे; परंतु, टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन दवाखाने सुरू होण्यास आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. या योजनेत टोल फ्री क्रमांकही सुरू केला जाणार आहे. पशुपालकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर पथक थेट पशुपालकाच्या दारी येऊन जनावरांवर उपचार करणार आहेत. जनावरांचे संसर्गजन्य आजार, प्रोटोझोन विकार, अन्न विषबाधा, अतिसार, वनस्पतीजन्य विषबाधा, सर्पदंश, कीटकाचा चावा, अॅलर्जी, पक्षाघात यांसारख्या आजारावर उपचार होणार आहेत.
..............