अ‍ॅपशहर

जुने सौर प्रकल्प कागदावरच

नगर जिल्ह्यात खासगीकरणातून दोन सौर फीडर प्रकल्प उभारण्याच्या सात महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणेचा विसर राज्यातील भाजप सरकारला पडला आहे.

Maharashtra Times 26 Apr 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new solar project
जुने सौर प्रकल्प कागदावरच


नगर जिल्ह्यात खासगीकरणातून दोन सौर फीडर प्रकल्प उभारण्याच्या सात महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणेचा विसर राज्यातील भाजप सरकारला पडला आहे. संगमनेर तालुक्यात प्रस्तावित असलेले हे दोन्ही प्रकल्प अजूनही कागदावर आहेत. असे असतानाही, पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे असा पथदर्शी प्रकल्प नव्याने उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील आठवड्यात राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांनी राळेगणसिद्धीमधील कालव्यांवर सौर पॅनल टाकून त्यातून निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांना दिवसा पुरविण्यासाठी स्वतंत्र सौर फीडर उभारण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर, सात महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाने घेतलेल्या अशाच एका निर्णयाचा आढावा घेतला असता त्या वेळी घोषणा केलेले दोन्ही प्रकल्प अजूनही कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले.

सप्टेंबर २०१६च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत संगमनेर तालुक्यातील दोन सौर फीडरचा निर्णय झाला होता. शेतीसाठीची वीज उपलब्धता वाढण्यासाठी ग्रामीण भागात सौर उर्जेवरील वीजवाहिन्या (फीडर) खासगीकरणातून उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. यासाठी नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार व निमोण या दोन वीज उपकेंद्रांची निवड करण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रायोगिक प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. पण अजूनही हे प्रकल्प सुरू झालेले नाहीत. किंबहुना जिल्ह्यातील महावितरणच्या यंत्रणेला असे प्रकल्प प्रस्तावित असल्याचेही माहिती नाही. अशा कोणत्याही प्रकल्पाचे काम सुरू नाही, फक्त राळेगणसिद्धीच्या नव्या प्रकल्पाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कृषी क्षेत्रासाठी राज्यात ३० टक्के वीज वापरली जात असून, ग्रामीण भागात गावठाण फीडर व कृषी फीडर वेगवेगळे आहे. लोडशेडिंगमुळे कृषी फीडरचा वीजपुरवठा रात्रीच केला जातो. मात्र, दिवसा वीज द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यामुळे अशा कृषी फीडरला नियमितपणे वीजपुरवठा उपलब्ध होण्यासाठी सौर उर्जेवरील कृषी फीडर निर्मितीचा विचार करून यासाठीचा प्रायोगिक प्रकल्प संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार व निमोण उपकेंद्रात सुरू करताना या प्रकल्पासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा व खासगी विकसकाद्वारे या प्रकल्पाची निर्मिती करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. पण अजूनही त्याची प्रत्यक्षातील अंमलबजावणी झालेली नाही.

सौर उर्जेवरील कृषी फीडर प्रकल्प राज्यात अन्य ठिकाणीही सुरू करण्यासाठी फ्रँचाईजी मॉडेल तयार करण्याचेही शासनाने ठरवले होते. संगमनेर तालुक्यातील या दोन्ही प्रायोगिक प्रकल्पांच्या यशस्वी वाटचालीवर राज्यात अन्यत्र असे प्रकल्प उभारले जाणार होते. संगमनेरच्याच प्रकल्पांचे भवितव्य अंधारलेले असल्याने राज्यातील अन्य प्रकल्पही स्वप्नवतच आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज