म. टा. वृत्तसेवा, राहुरी
नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्याने शुभ संकेत मानले जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच सुमारे १३ हजार ७७५ क्युसेकने नवीन पाण्याची आवक होत आहे.
सव्वीस हजार दशलक्ष घनफूट (२६ टीएमसी) पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात गुरुवारी (१२ जुलै) सुमारे सहा हजार (२३ टक्के) दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. शेतीसिंचनाचे आवर्तन संपल्यानंतर पिण्याच्या पाणी योजनांना पाणी राखून ठेवण्यात आले होते. पाणीसाठा पाच हजार दशलक्ष घनफुटांच्या आत आला होता, त्यामुळे राहुरीसह अन्य प्रादेशिक पिण्याच्या पाणी योजनांना अडचणी सुरू झाल्या होत्या; मात्र, मध्यंतरीच्या पावसामुळे धरणात नवीन पाण्याची आवक धिम्या गतीने सुरू झाली. अकोले तालुक्यातील कोतूळ व हरिश्चंद्र गडावर पाऊस झाल्याने तेथील पाणी धरणात जमा होण्यास प्रारंभ झाला. पारनेर व परिसरातील पावसाचे पाणीही धरणाकडे येत असते तेथील पावसाचा लाभही धरणाला होतो. गेल्या दोन दिवसांपूर्वी कोतूळ येथे १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव या चार तालुक्यांतील शेतीसिंचनाला मोठा हातभार लागल्याने धरणातील पाणीसाठ्याकडे शेतकऱ्यांचे सर्वाधिक लक्ष लागलेले असते. औद्योगिक वसाहती, सहकारी साखर कारखाने, विविध पाणी योजना, नियोजित विद्युत प्रकल्प मुळाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.