म. टा. प्रतिनिधी, नगर
नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीयोजनेचा वीजपुरवठा तोडण्याचा इशारा महावितरणने पुन्हा नव्याने दिला आहे. या योजनेच्या वीज बिलाचे थकीत १५० कोटी रुपये तातडीने भरले नाहीत तर पाणी योजनेला तीन ठिकाणी केला जाणारा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. चार महिन्यांपूर्वी असा वीजपुरवठा तब्बल १२ तास तोडला गेल्याने शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळित झाला होता. आता पुन्हा अशी स्थिती येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नगर शहराचा पाणीपुरवठा मागील पंधरवड्यापासून विस्कळित झाला आहे. विळद जलशुद्धीकरण केंद्रातील स्लुस व्हॉल्व्ह नादुरुस्तीनंतर मुळा धरणाजवळील बाभळगाव परिसरातील जुनी पाइपलाइन फुटल्याने शहरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा मागील १५ दिवसांत झालेला नाही. अशा स्थितीत शनिवारी (१५ जुलै) महावितरणच्या वीज वाहिनी दुरुस्ती कामामुळे उपनगराचा पाणीपुरवठा या दिवशी बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आता वीजबिल थकबाकीमुळे पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडला गेला तर नव्याने पाणीटंचाईच्या संकटाचा सामना नगरकरांना करावा लागणार आहे.
केवळ ७५ लाख जमा
यंदाच्या चालू वर्षातील मागील एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या पाणी योजना वीज बिलापोटी महापालिकेने केवळ ७५ लाख रुपये महावितरणकडे जमा केले आहेत. नगर शहराच्या पाणी योजनेसाठी मुळा धरण, विळद जलशुद्धीकरण केंद्र व नागापूर उपकेंद्र या तीन ठिकाणांहून पाणीउपसा केला जातो. त्यासाठी वीजपुरवठा घेतला जातो. या तिन्ही वीज कनेक्शन्सचे मासिक वीज बिल सुमारे दीड ते पावणे दोन कोटींचे होते. मात्र, मागील तीन महिन्यांच्या या सुमारे ५ कोटींच्या वीज बिलापैकी केवळ ७५ लाखच महापालिकेने जमा केल्याने हे सव्वाचार कोटी तसेच मागील १५-१६ वर्षांची जुनी थकबाकी मिळून तब्बल १५० कोटींची वीजबिल बाकी आहे. ती येत्या २४ तासांत जमा केली नाही तर पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडण्याची नोटीस महावितरणने पालिकेला बजावली आहे.
मागील धडा दुर्लक्षित
महावितरणद्वारे १७ मार्च २०१७ रोजी तब्बल १२ तास पाणीयोजनेचा वीजपुरवठा बंद ठेवून महापालिकेला दिलेला धडा सध्या विस्मरणात गेल्याची स्थिती आहे. त्या वेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदेंसह खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप व मनपाशी संबंधित सर्व नेत्यांना साकडे घालूनही महापालिकेकडील थकीत रकमेची वसुली झाली नसल्याने त्या वेळी महावितरणने पाणी योजनेची वीज तोडली; मात्र, पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असल्याने टोकन स्वरूपात ही कारवाई होईल, असे महापालिकेसह सर्वांनाच वाटत होते. पण त्यादिवशी तब्बल १२ तास वीज बंद ठेवली होती, तसेच थकीत वीज बिलापोटी साडेआठ कोटींचे धनादेशही महापालिकेकडून घेतले गेले होते. सुदैवाने हे धनादेश महापालिकेकडून वटले गेले असले तरी दरम्यानच्या काळात पाणीयोजनेचे चालू बिल भरण्याकडेही दुर्लक्ष झाल्याने पुन्हा वीज बिल थकबाकी वाढली आहे.
चौकट ः
अनागोंदीची स्थिती
पाणी योजनेचे पावणे दोन कोटी तसेच पथदिव्यांचे ५० लाख वीजबिल दरमहा येते. पण ते नियमितपणे भरले जात नाही. शहरातील बहुतांश रस्त्यांवर महावितरणचे विद्युत खांब असताना महापालिकेद्वारे नवे एलईडी खांब उभारले जातात, पण त्यांच्यासाठी महावितरणकडून अधिकृत विद्युत भार वाढवून न घेता जुन्या खांबांवरूनच या नव्या खांबांसाठी वीज घेतली जाते. परिणामी, एकाच रस्त्यावर महावितरण व महापालिकेचे स्वतंत्र दिवे प्रकाशमय असतात. अनागोंदीच्या या स्थितीने मनपाची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे.
नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीयोजनेचा वीजपुरवठा तोडण्याचा इशारा महावितरणने पुन्हा नव्याने दिला आहे. या योजनेच्या वीज बिलाचे थकीत १५० कोटी रुपये तातडीने भरले नाहीत तर पाणी योजनेला तीन ठिकाणी केला जाणारा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. चार महिन्यांपूर्वी असा वीजपुरवठा तब्बल १२ तास तोडला गेल्याने शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळित झाला होता. आता पुन्हा अशी स्थिती येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नगर शहराचा पाणीपुरवठा मागील पंधरवड्यापासून विस्कळित झाला आहे. विळद जलशुद्धीकरण केंद्रातील स्लुस व्हॉल्व्ह नादुरुस्तीनंतर मुळा धरणाजवळील बाभळगाव परिसरातील जुनी पाइपलाइन फुटल्याने शहरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा मागील १५ दिवसांत झालेला नाही. अशा स्थितीत शनिवारी (१५ जुलै) महावितरणच्या वीज वाहिनी दुरुस्ती कामामुळे उपनगराचा पाणीपुरवठा या दिवशी बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आता वीजबिल थकबाकीमुळे पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडला गेला तर नव्याने पाणीटंचाईच्या संकटाचा सामना नगरकरांना करावा लागणार आहे.
केवळ ७५ लाख जमा
यंदाच्या चालू वर्षातील मागील एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या पाणी योजना वीज बिलापोटी महापालिकेने केवळ ७५ लाख रुपये महावितरणकडे जमा केले आहेत. नगर शहराच्या पाणी योजनेसाठी मुळा धरण, विळद जलशुद्धीकरण केंद्र व नागापूर उपकेंद्र या तीन ठिकाणांहून पाणीउपसा केला जातो. त्यासाठी वीजपुरवठा घेतला जातो. या तिन्ही वीज कनेक्शन्सचे मासिक वीज बिल सुमारे दीड ते पावणे दोन कोटींचे होते. मात्र, मागील तीन महिन्यांच्या या सुमारे ५ कोटींच्या वीज बिलापैकी केवळ ७५ लाखच महापालिकेने जमा केल्याने हे सव्वाचार कोटी तसेच मागील १५-१६ वर्षांची जुनी थकबाकी मिळून तब्बल १५० कोटींची वीजबिल बाकी आहे. ती येत्या २४ तासांत जमा केली नाही तर पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडण्याची नोटीस महावितरणने पालिकेला बजावली आहे.
मागील धडा दुर्लक्षित
महावितरणद्वारे १७ मार्च २०१७ रोजी तब्बल १२ तास पाणीयोजनेचा वीजपुरवठा बंद ठेवून महापालिकेला दिलेला धडा सध्या विस्मरणात गेल्याची स्थिती आहे. त्या वेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदेंसह खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप व मनपाशी संबंधित सर्व नेत्यांना साकडे घालूनही महापालिकेकडील थकीत रकमेची वसुली झाली नसल्याने त्या वेळी महावितरणने पाणी योजनेची वीज तोडली; मात्र, पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असल्याने टोकन स्वरूपात ही कारवाई होईल, असे महापालिकेसह सर्वांनाच वाटत होते. पण त्यादिवशी तब्बल १२ तास वीज बंद ठेवली होती, तसेच थकीत वीज बिलापोटी साडेआठ कोटींचे धनादेशही महापालिकेकडून घेतले गेले होते. सुदैवाने हे धनादेश महापालिकेकडून वटले गेले असले तरी दरम्यानच्या काळात पाणीयोजनेचे चालू बिल भरण्याकडेही दुर्लक्ष झाल्याने पुन्हा वीज बिल थकबाकी वाढली आहे.
चौकट ः
अनागोंदीची स्थिती
पाणी योजनेचे पावणे दोन कोटी तसेच पथदिव्यांचे ५० लाख वीजबिल दरमहा येते. पण ते नियमितपणे भरले जात नाही. शहरातील बहुतांश रस्त्यांवर महावितरणचे विद्युत खांब असताना महापालिकेद्वारे नवे एलईडी खांब उभारले जातात, पण त्यांच्यासाठी महावितरणकडून अधिकृत विद्युत भार वाढवून न घेता जुन्या खांबांवरूनच या नव्या खांबांसाठी वीज घेतली जाते. परिणामी, एकाच रस्त्यावर महावितरण व महापालिकेचे स्वतंत्र दिवे प्रकाशमय असतात. अनागोंदीच्या या स्थितीने मनपाची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे.