धान्याच्या पोत्यांचे वजन कमी; झेडपी सदस्य वाकचौरे यांनी केला निषेध
म. टा. प्रतिनिधी, नगर
शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत सदस्य सातत्याने तक्रारी करत आहेत. शालेय पोषण आहारातील हळद व मीठ निकृष्ट आहेत. तसेच धान्याचे पोतेही वजनात कमी भरत असल्याचे स्पष्ट करत यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. याबाबत वाकचौरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन हळद व मीठ भेट देत याप्रकाराचा निषेध केला.
जिल्हा परिषदेच्या शाळांतून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत सदस्यांकडून कायमच तक्रारी केल्या जातात. आहार निकृष्ट असल्याच्या तक्रारी याआधीही झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनीही पोषण आहार निकृष्ट असल्याची तक्रार करून या आहाराची तपासणी करण्याची मागणी थेट अन्न औषध विभागाकडे केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी शाळेतील पोषण आहाराच्या साहित्याचे नमुने घेतले. या आहाराचे तपासणी अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. त्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्य वाकचौरे यांनी राहुरी तालुक्यातील शाळांना भेट दिली. येथील पोषण आहाराची पाहणी केली. आहारात वापरले जाणारे हळद व मीठ निकृष्ट असल्याचे दिसून आले. तांदळाच्या पन्नास किलोच्या पोत्यात पाच किलोपर्यंत धान्य कमी भरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वाकचौरे यांनी केला आहे. या प्रकरणी वाकचौरे यांनी शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची भेट घेतली. तसेच या प्रकाराचा निषेध केला. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.
प्रशासनाची डोळेझाक
वाकचौरे यांनी याआधीही पोषण आहाराबाबत तक्रार केली आहे. अन्य सदस्यही तक्रार करत असतात. तरी देखील प्रशासनाकडून मात्र गांभीर्याने दखल घेतली जात नाही. सदस्यांनी तक्रार केल्यानंतर पोषण आहाराची तपासणी करू, चौकशी करण्यात येईल, अशी उत्तरे दिली जातात. पुढे मात्र यावर काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे पोषण आहाराबाबत आता सातत्याने तक्रारी होत आहेत. पोषण आहाराची तपासणी अन्न औषध विभागाकडून करून घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत पोषण आहाराच्या धान्याचे मोजमाप करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही तक्ररी थांबलेल्या नाहीत. त्यामुळे आता प्रशासनाच्या कारभारावरच शंका उपस्थित केल्या जात आहेत.