अ‍ॅपशहर

अत्याचाराचे गुन्हे वाढले

राज्यभर गाजलेला कोपर्डीचा खटला जलद गतीने निकाली काढण्यात यश आले असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या अन्य घटनांकडे मात्र दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील वर्षीही महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Maharashtra Times 26 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ofence against women increased this year
अत्याचाराचे गुन्हे वाढले


राज्यभर गाजलेला कोपर्डीचा खटला जलद गतीने निकाली काढण्यात यश आले असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या अन्य घटनांकडे मात्र दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील वर्षीही महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे न्यायालयात दाखल ९३ टक्के खटलेही प्रलंबित राहिले आहेत. राज्यात मागील वर्षी महिलांवरील अत्याचाराचे विविध कलमान्वये ३१ हजार २७५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील प्रमाण सुमारे साडेतीन टक्के आहे.

वर्षभरात महिला अत्याचाराचे प्रमाण किंचित वाढले आहे. बलात्कार, विनयभंग, अपहरण करणे असे ३१ हजार गुन्हे दाखल असून, त्यात मुंबई शहर व पुणे शहरातच सर्वाधिक महिलांचे गुन्हे दाखल आहेत. नगर सहाव्या स्थानावर आहे. राज्यातील गुन्हेगारीचा आढावा घेणाऱ्या महाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१६ च्या अहवालातील आकडेवारीतून हे वास्तव स्पष्ट होत आहे. मागील वर्षी राज्यात महिलांवरील अत्याचार, छेडछाड, विनयभंग करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे असे तब्बल ३१ हजार २७५ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१५ च्या तुलनेत हे गुन्हे किंचित वाढले आहेत. २०१५ मध्ये हे ३१ हजार २२६ गुन्हे दाखल आहेत. तर २०१४ च्या तुलनेत हे गुन्हे पाच हजारांपेक्षा जास्त आहेत. २०१४ मध्ये महिलांवरील अत्याचाराचे २६ हजार गुन्हे दाखल होते. त्यात मोठ्या शहरातील महिला या असुरक्षित असून, एकूण गुन्ह्यांपैकी साडेसोळा टक्के गुन्हे एकट्या मुंबईत घडले आहेत. त्यानंतर सात टक्के गुन्हे हे पुणे शहरात घडले आहेत. ठाणे शहरात पाच टक्के, नागपूर शहरात ४.३८ टक्के, पुणे ग्रामीणला ३.९२ टक्के, तर नगर जिल्ह्यात ३.३२ टक्के गुन्हे घडले आहेत. नगरपाठोपाठ औरंगाबाद शहरात ३.२२ टक्के गुन्हे घडले आहेत. मागील वर्षी कर्जतमधील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून खून करणे हा गुन्हा राज्यभर गाजला होता. राज्यात मागील वर्षी ४ हजार ८९ महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. त्यात मुंबई शहरात २ हजार ८३, पुणे शहरात ६६१, पुणे ग्रामीणला ४७८, औरंगाबाद शहरात ४७१, तर नगरमध्ये ४२९ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. शहरांबरोबर ग्रामीण भागातही अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेले आहेत. शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची छेडछाड करून विनयभंग करणे, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे हे गुन्हे वाढत आहेत.

चौकट ः

४२ टक्के गुन्हे अल्पवयीन मुलींबाबत

राज्यात ४ हजार २१६ बलात्काराचे गुन्हे वर्षभरात दाखल झाले आहेत. त्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांची संख्याही जास्त आहे. मागील वर्षभरात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात १६ ते १८ वयोगटातील १ हजार २३० मुलींवर (२५ टक्के), तर १२ ते १६ वयोगटातील ७३२ मुलींवर (१७ टक्के) लैंगिक अत्याचार झाले आहेत. त्या तुलनेत १८ वर्षांपुढील वयोगटात १८ ते ३० वयोगटातील १ हजार ४२५ (३४ टक्के), तर उर्वरित गुन्हे हे तीस वर्षांपढील महिलांबाबतचे आहेत.

चौकट ः

गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अवघे ११ टक्के

महिलांवरील गुन्हे वाढत असले तरी गुन्ह्यांचा तपास करून दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयात खटला चालवून आरोपींना शिक्षा करण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. मागील वर्षी १० हजार १४६ गुन्ह्यांची सुनावणी झाली. त्यात केवळ १ हजार १३३ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा झाली म्हणजे शिक्षा प्रमाण अवघे ११ टक्केच आहे. तर ९ हजार गुन्ह्यात आरोपी निर्दोष सुटले आहेत. विविध न्यायालयांत २०१६ अखेरपर्यंत महिलांविरुद्धचे १ लाख ६५ हजार खटले प्रलंबित असून, तब्बल ९३ टक्के खटले हे प्रलंबित आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज