अ‍ॅपशहर

नगरमध्ये कांदा पाच हजारांवर

नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारच्या लिलावात भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा कांदा पाच हजार रुपये क्विंटलने बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला, तर मध्यम कांद्याचा दर क्विंटलमागे सरासरी साडेचार हजार रुपये होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2019, 1:23 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम onion prices in the ahmednagar at five thousand
नगरमध्ये कांदा पाच हजारांवर


नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारच्या लिलावात भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा कांदा पाच हजार रुपये क्विंटलने बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला, तर मध्यम कांद्याचा दर क्विंटलमागे सरासरी साडेचार हजार रुपये होता. हा दर लासलगावच्या खालोखाल असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला. मात्र, नेहमी कमी भावाने कांदाविक्री कराव्या लागणाऱ्या कांदा उत्पादकांना या वर्षात पहिल्यांदाच चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या महिन्यापासून कांद्याची आवक कमी होत आहे, तर देशभरात कांद्याची मागणी होत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून कांद्याचे भाव वाढले आहेत. मागील लिलावात कांद्याचा भाव तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत गेला होता. गुरुवारी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे १५ हजार क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. कांद्याला मागणी असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी चांगल्या कांद्याच्या लिलावाला जास्त बोली लावली. चांगल्या दर्जाच्या कांद्याचा उच्चांकी भाव क्विंटलला चार हजार ६०० रुपये असा होता. दुपारपर्यंत हा भाव वाढून क्विंटलला पाच हजार १०० रुपयांपर्यंत गेला. मध्यम स्वरूपाच्या कांद्याला क्विंटलला साडेचार हजार रुपये भाव मिळाला आहे. गोल कांद्याला साडेतीन हजार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. या वर्षीचा हा उच्चांकी भाव आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी येत असल्याने देशभरात हा कांदा विक्रीला जातो. गुरुवारच्या लिलावात मिळालेला भाव राज्यात सर्वाधिक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या लिलावात कांद्याला साडेचार हजार रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. गेल्या महिन्याच्याा तुलनेत या लिलावात तब्बल दुप्पट भाव वाढला आहे. अनेक कांदा उत्पादकांनी यापूर्वी कांदा विकला असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत आवकही निम्म्याने घटली आहे. त्यामुळे भावात वाढ होत आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत कांद्याला उच्चांकी भाव राहील, असे व्यापारी सांगत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज