एसटीच्या अठराशे फेऱ्या रद्द
जिल्ह्यातील सर्वच आगारांतील एसटी थांबली; प्रवाशांचे झाले हाल
म. टा. प्रतिनिधी, नगर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी राज्यभरात पुकारण्यात आलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. बंद काळात जिल्ह्यातील एसटीच्या आगारांतून एकही बस सुटली नाही. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एसटीच्या १ हजार ८५८ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. बसस्थानकातही शुकशुकाट झाला होता. वाहतूक बंद असल्याने नगर शहरातील बसस्थानके बंद करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत एसटीची वाहतूक सुरू झाली नव्हती.
बंद काळात एसटीची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय कार्यालयाने घेतला होता. त्यामुळे गुरुवारी एसटी बसस्थानकातून बाहेर पडली नाही. जिल्ह्यात एसटी महामंडळाची अकरा आगारे आहेत. या सर्व आगारांतील बस रस्त्यांवर धावल्या नाहीत. त्यामुळे एसटीस आर्थिक नुकसान सहन करावे लागले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १ हजार ८५८ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यानंतरही वाहतूक सुरू झाली नसल्याने आणखी काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यातून एसटीस मिळणाऱ्या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागले. जिल्ह्यात सर्वत्रच ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने सुरू असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली. नगर शहरातील तारकपूर, माळीवाडा, स्वस्तिक बसस्थानकांसह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांत शुकशुकाट झाला होता. एसटी बंद असल्याने प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागला. खासगी प्रवासी वाहनांतून प्रवास करावा लागला.
बंद असल्याने रस्त्यांवरही शुकशुकाट दिसत होता. वाहनेही फारशी नव्हती. बंद होणार असल्याचे आधीच माहित असल्याने नागरिकांनी प्रवास करणे टाळले. त्यामुळे बसस्थानकांच्या बाहेरही प्रवासी फारसे दिसले नाहीत. तसेच खासगी प्रवासी वाहनेही फारशी दिसली नाहीत. दरम्यान, बंद काळात एसटीच्या अधिकाऱ्यांकडून नियमितपणे एसटी वाहतुकीचा आढावा घेतला जात होता. प्रत्येक आगारातून किती फेऱ्या रद्द झाल्या याची माहिती घेतली जात होती. सायंकाळी सात वाजल्यानंतरही जिल्ह्यातील वाहतूक सुरू झालेली नव्हती. त्यामुळे पुढील वेळेत आणखी काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.