अ‍ॅपशहर

​पांगरमलमध्ये होणार दारूबंदी

बनावट दारू दुर्घटनेनंतर हादलेल्या पांगरमल (ता. नगर) या गावात लवकरच दारूबंदी करण्यात येणार असून त्यासंदर्भात या आठवड्यात ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

Maharashtra Times 21 Feb 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pangarmal darubandi
​पांगरमलमध्ये होणार दारूबंदी


बनावट दारू दुर्घटनेनंतर हादलेल्या पांगरमल (ता. नगर) या गावात लवकरच दारूबंदी करण्यात येणार असून त्यासंदर्भात या आठवड्यात ग्रामसभा घेण्यात येणार आहे. गावात अधिकृत दारूचे दुकान नाही, मात्र बेकायदा दारूविक्रीही बंद करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी दिली. जिल्हा दारूबंदी कृती समितीचे अध्यक्ष बाबा सोनवणे यांनी सोमवारी गावात जाऊन बैठक घेतली. त्यानंतर गावाने ही तयारी सुरू केली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात उमेदवाराने वाटलेल्या दारूने या गावातील बळी घेतले आहेत. आणखी काही जण अत्यवस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हा दारूबंदी कृती समितीचे अध्यक्ष बाबा सोनवणे, सचिन त्रिभुवन, श्रीकांत भालेराव यांनी गावाला भेट दिली. तेथे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना दारूबंदीचे महत्त्व समाजावून सांगितले. पूर्वी कृती समितीतर्फे यासाठी ठराव घेण्याची मोहीम काढली होती. जिल्ह्यातील ६७७ गावांनी दारबंदीचे ठराव केले. त्या वेळी पांगरमल गावात ठराव होऊ शकला नव्हता. मात्र, आताच्या घटनेमुळे हादरलेल्या गावकऱ्यांनी दारूबंदीसाठी तयारी दर्शविली आहे. गावचे सरपंच आव्हाड यांनी सांगितले, 'गावात अधिकृत दारूचे दुकान नाही. वेशीच्या बाहेर दारूची काही अनधिकृत दुकाने आहेत. घटना घडल्यानंतर ती बंद असली तरी पुन्हा सुरू होणार नाहीत, यासाठी ग्रामसभा बोलावून ठराव घेतला जाईल. याशिवाय दारूबंदीविषयी गावात प्रबोधन करण्यात येऊन व्यसनमुक्तीवर भर दिला जाईल. यासाठी दारूबंदी कृती समितीचे सहकार्य लाभत आहे.'

कृती समितीचे सोनवणे म्हणाले, 'जिल्ह्यात दारूबंदी करा, यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. मात्र, प्रशासकीय यंत्रणेकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. यासंबंधी वेळीच पावले उचलली असती तर या लोकांचे जीव वाचले असते. बेकायदा, बनावट दारूलाही सरकार आळा घालू शकत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. या गावात दारूबंदी आणि लोकप्रबोधनासाठी आम्ही लक्ष घालणार आहोत. येथील पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे.'

२१ जणांची तपासणी

पांगरमल येथे दारूच्या दुर्घटनेनंतर इतर ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने सोमवारी २१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. विषारी दारू प्रशासन केल्यानंतर गावामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामस्थांना दिलासा देण्याचा काम या फाउंडेशनकडून होत आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी रविवारी या गावाला भेट देऊन आरोग्य शिबिर आयोजित करून वैद्यतपासणी करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी या फाउंडेशनच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पॅथॉलाजी विभागाचे प्रमुख डॉ. गोकुळ पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने २१ जणांच्या विविध तपासण्या केल्या आहेत. या तपासण्याच्या अहवालानंतर या रुग्णांवर पुढील उपचार केले जाणार आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या इतर दहा जणांपैकी अद्याप एकही रुग्णही विखे फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेला नाही. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा आवाहन फाउंडेशनच्या वतीने रविवारी करण्यात आलेले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज