कार्यकर्त्यांच्या बैठकित बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र
म. टा. वृत्तसेवा, संगमनेर
'शरद पवारांनी मधुकर पिचडांवर असंख्य उपकार केले, त्यांच्या जिवनातून पवारांचे नाव वजा केले, तर बाकी शून्य राहते. त्यांनी पवारसाहेब अडचणीत असताना त्यांना सोडले. वयाच्या ८० व्या वर्षी त्या माणसाला तुमच्या विरोधात भाषणं करायला लावलीत. हा कृतघ्नपणा आहे. सगळं काही व्यवस्थित असताना पिचडांनी भाजपमध्ये जायला नको होते. त्यांची ही कृती म्हणजे 'काशीहून आणले आणि वेशीवर सांडल्या' सारखी असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर केली.
अकोले विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी पठारभागातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, विकास शेळके, सुहास वाळूंज, डॉ. दत्ता हांडे, पांडू शेळके, सुभाष आहेर, गणेश सुपेकर, अर्जुन घुले, अरुण वाघ, सुहास आहेर, संदीप नायकवडी, विनय फटांगरे, सुरेश कान्हेरे, रमेश आहेर, लहू नरवडे आदीसह पठार भागातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, 'आयुष्यभर गळ्यात माळ घालणाऱ्याने शेवटच्या वेळी मात्र खायची इच्छा राहूनच गेली असे म्हणण्यासारखे आहे. ज्यांनी पिचडांना भरभरुन दिले त्यांच्यासोबतही ते राहिले नाहीत, तर तुमची काय गत आहे? असा सवाल करीत या निवडणूकीत पठार भागाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे,' असे आवाहन त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले. थोरात म्हणाले, 'जिल्हा बँकेतही विखेंशी भांडून आपण त्यांना चेअरमनपद दिल्यानंतरही ते तिकडे जाऊन बसले. ज्यांनी ज्यांनी पिचडांवर उपकार केले त्यांच्यासोबत ते असेच वागले. त्यातून शरद पवारांसारखा माणूसही सुटला नाही, मग तुमच्या सारख्या सामान्य मतदाराची ते काय किंमत ठेवणार आहेत. पिचडांनी नेहमीप्रमाणे पठारभागाला गृहीत धरले आहे. त्यांना असे वाटत असेल की गेल्या चाळीस वर्षांत आपण पठार भागाला खूप काही दिले आहे. त्यामुळे शेवटच्या दोन-चार दिवसांचे गणित जमून जाईल. पण परिस्थिती तशी नाही. पिचडांच्या कृतघ्नतेमुळे सर्वसामान्य मतदार, शेतकरी पेटून उठला असून त्याचा हा रोष आपल्याला मतपेटीतून दिसून येईल,' असेही थोरात म्हणाले.
--
पिचडांच्या अडचणी वाढल्या
संगमनेर तालुक्याच्या पठारावरील ५९ गावांचा समावेश अकोले विधानसभा मतदारसंघात होता. विधानसभेसाठीच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये यापैकी ३२ गावे राहिली आहेत. या गावांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांचा वरचष्मा आहे. या अगोदरच्या प्रत्येक निवडणुकीत मधुकर पिचड यांना बाळासाहेब थोरात यांची राजकीय साथ मिळत होती. पण आता चित्र पूर्ण बदलले आहे. युतीच्या विरोधात आघाडीची ताकद पणाला लागणार आहे.