लेखी आश्वासनानंतर आमदार विजय औटींचे उपोषण मागे
म. टा. वृत्तसेवा, पारनेर
पिंपळगाव जोगा धरणातून पारनेर तालुक्यासाठी आठवडाभरापूर्वी आवर्तन सुटूनही पाणी येऊ शकले नाही. पारनेर तालुक्यातील गावांना 'टेल टू हेड' या सुत्रानुसार पाणी द्यावे, या मागणीसाठी आमदार विजय औटी यांनी सुरू केलेले उपोषण आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. पाटबंधारे विभागाने मंगळवारी (८ नोव्हेंबर) पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी कालव्यांद्वारे वडझिरेपर्यंत येते. आवर्तन सोडल्यानंतर आठवडा उलटला तरी पारनेर तालुक्यात पाणी आले नव्हते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तरी त्यांच्याकडून कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार विजय औटी यांनी शुक्रवारी (२ नोव्हेंबर) सकाळी नारायणगाव येथील पाटबंधारे कार्यालय गाठले. आमदार औटी यांनी पारनेरला पाणी देण्याच्या मागणीसाठी कार्यालयातच उपोषण सुरू केले. मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या नद्यांच्या काठांवर औरंगाबादचे पोलिस आणि अधिकारी तैनात केले जातात. पारनेरला पाणी देण्याबाबत नगरचे जिल्हा प्रशासन काहीही करत नसल्याचा आरोप आमदार औटी यांनी या वेळी केला. आमदार औटी यांच्या पावित्र्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने सुत्रे हलवली. कालव्यांमधून विद्युतपंपाद्वारे होणारी पाणी चोरी थांबवली जाईल. वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्तही घेतला जाईल. मंगळवारपर्यंत (६ नोव्हेंबर) पारनेरमध्ये पाणी दाखल होईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार औटी यांनी उपोषण मागे घेतले.
पुण्यातील राजकारणी कारणीभूत
पिंपळगाव जोगा धरणातील पाणी वाटपाचे सुत्र ठरलेले आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील अधिकारी व राजकारणी संगनमताने पारनेर तालुक्याला पाणी मिळू देत नसल्याचा आरोप पारनेरकरांकडून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (७ नोव्हेंबर) सुपा औद्योगिक वसाहतीत येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर आमदार औटी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत प्रशासनाला कोंडीत पकडले. त्यामुळे तातडीने हालचाली करीत मंगळवारपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय पाठबंधारे विभागाने घेतला आहे.