'पिंपळगाव'चे पाणी
राळेगणसिद्धीपर्यंत
म. टा. प्रतिनिधी, नगर
पिंपळगाव जोगे कालव्यातून देवीभोयरे ते राळेगणसिद्धी दरम्यानच्या दहा गावांना पाणी देण्यासंबंधी सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या बैठकीत देण्यात आल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मुंबईतील निवासस्थानी शुक्रवारी या संबंधी बैठक झाली.
या बैठकीत पारनेर तालुक्यातील शेतीच्या पाणीपुरवठ्यासंबंधी अनेक निर्णय घेण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून हजारे आणि मंत्री महाजन यांचा संपर्क वाढला आहे. लोकपालसाठीचे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर प्रथमच या दोघांची मुंबईत बैठक झाली. डिंभे धरण बोगद्याच्या माध्यमातून माणिकडोह धरणाला जोडणे, पारनेर तालुक्यातील शिवडोहपासून पानोली, गांजीभोयरे, राळेगणसिद्धी आणि लगतच्या गावांना सिंचनाचे पाणी देण्यासाठी सर्वेक्षण करणे असे महत्त्वाचे आदेश बैठकीत देण्यात आले; तसेच पिंपळगाव खांड धरणाच्या प्रकल्प अहवालात पारनेर तालुक्यातील बंधारे भरून घेण्यासाठी समावेश करणे आणि चिलेवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी पारनेर तालुक्याला देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली.
या बैठकीला महाजन, हजारे यांच्यासोबतच आमदार राहुल जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
............