म. टा. प्रतिनिधी, नगर राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत वनविभाग व अन्य सरकारी विभाग जिल्ह्यात तीस लाख रोपे लावणार आहे. या उपक्रमाची सुरुवात जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपणाने करण्यात आली. या वेळी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपवनसंरक्षक श्री. लक्ष्मी, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले आदी उपस्थित होते. या योजनेत जिल्ह्यात ७ जुलैपर्यंत तीस लाख रोपे लागवड होणार आहे. या कामाचे नियोजन वनविभागाने केले आहे. सामाजिक वनीकरण व वनविभाग २२ लाख, ग्रामपंचायत ५ लाख ३८ हजार आणि इतर सरकारी विभाग तीन लाख रोपे लागवड करणार आहे. शनिवारी रोपे लागवडीच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, सरकारी, निमसरकारी कार्यालये, धार्मिक स्थळे, सेवाभावी संस्था, कारखाने, मजूर संस्था, जलयुक्त शिवार योजनेतील गावे, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या अशा एकूण १७ यंत्रणा सहभाग घेणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सीईओ रवींद्र बिनवडे, अशोक कोल्हे, कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे उपस्थित होते. नगर तालुक्यातील हिवरेबाजार येथे कृषीदिनानिमित्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बाळकृष्ण शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आदर्शगाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, पाणी फाउंडेशनचे धीरज पराशर, डॉ. संजय चाकणे, गोरक्षनाथ सोनवणे उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील मजलेचिंचोली येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पहिल्या दिवशी साडे पाच लाख रोपे लागवड
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरात ५ लाख ६२ हजार रोपे लागवड करण्यात आली. यामध्ये वनविभाग ४ लाख ७३ हजार, ग्रामपंचायत ८२ हजार आणि अन्य सरकारी विभागांनी साडेसहा हजार रोपे लागवड केली. ७ जुलैपर्यंत वृक्ष लागवड केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी रोपांची मागणी केली असून त्यांनाही रोपे दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पहिल्या दिवशी साडे पाच लाख रोपे लागवड
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरात ५ लाख ६२ हजार रोपे लागवड करण्यात आली. यामध्ये वनविभाग ४ लाख ७३ हजार, ग्रामपंचायत ८२ हजार आणि अन्य सरकारी विभागांनी साडेसहा हजार रोपे लागवड केली. ७ जुलैपर्यंत वृक्ष लागवड केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी रोपांची मागणी केली असून त्यांनाही रोपे दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.